अॅम्ब्युलन्समधून आली आणि सरपंच झाली, वाचा औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं?
वडोद बाजार ग्रामपंचायतची निवडणूक ही खूप अटीतटीची झाली होती. सदस्य फुटू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. | Aurangabad
औरंगाबाद: आजपर्यंत सरपंचपदाच्या निवडीसाठी आपण थेट हेलिकॉप्टरने सदस्य ग्रामपंचायत मध्ये दाखल झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद बाजार ग्रामपंचायतीचे सदस्य आज सरपंच निवडीसाठी रुग्णवाहिकेतून निवडीच्या ठिकाणी दाखल झाले. (Sarpanch Election in Aurgabad)
वडोद बाजार ग्रामपंचायतची निवडणूक ही खूप अटीतटीची झाली होती. सदस्य फुटू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी या सदस्यांना आज सरपंच निवडीच्या ठिकाणी थेट रुग्णवाहिकेतून आणण्यात आले.यावेळी पाकिजा पठाण या महिलेची सरपंच पदी निवड करण्यात आली. त्यामुळे रुग्णवाहिकेतून आली आणि सरपंच झाली, अशी चर्चा संपूर्ण गावात रंगली होती.
आज औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला वाळूज एमआयडीसी परिसरातील तीन मोठ्या ग्रामपंचायतवरही आज नव्या उमेदवारांनी सरपंच पदाची धुरा हाती घेतली. यात जोगेश्वरी ग्रामपंचायतमध्ये गजानन बोंबले, रांजणगाव शे.पु. ग्रामपंचायतमध्ये कांताबाई जाधव, वाळूज ग्रामपंचायतमध्ये सईदा नबी पठाण यांची सरपंच पदी निवड करण्यात आली.
महिला सदस्याची आधी बिनविरोध निवड, निकालानंतर गायब, सरपंच निवडीच्या दिवशी हजर, ग्रामस्थांकडून मारहाण
सरपंचपदाच्या निवडीच्या वेळेला दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. जी महिला बिनविरोध निवडून आली होती त्या महिलेला महिला ग्रामस्तानी मारहाण केली. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असताना महिला सदस्यला मारहाण करण्यात आली. सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरे येथे ही घटना घडली. संबंधित महिला सदस्याचं नाव सुमन सातकर असं आहे.
वायचाळ पिंपरे ग्रामपंचायतीचा निकालही विलक्षण आणि भयानक आला होता. दोन्ही पॅनलचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आले होते. त्यापैकी एका पॅनलची महिला सदस्य ही अगोदरपासूनच बिनविरोध निवडून आली होती. मात्र, बिनविरोध निवडून आलेली महिला निकाल लागल्यापासून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या पॅनलमधील सदस्यांना समोरच्या पॅनलच्या सदस्यांवर शंका होती. संबंधित महिला समोरच्या पॅनलच्या सदस्यांसोबत सहलीला गेल्याचा अंदाज काही लोकांनी वर्तवला होता.
दरम्यान, वायचाळ पिंपरे ग्रामपंचायतीचा आज सरपंचपदाची निवड करण्यात येणार होती. यासाठी बिनविरोध निवडून आलेल्या महिला सदस्य सुमन सातकर या ग्रामपंचायतीत दाखल झाल्या. निवडणुकीच्या निकालापासून गायब झालेली महिला सदस्य अचानक सरपंचपदाच्या निवडीच्या वेळी दाखल झाल्याने गावकऱ्यांना धक्काच बसला. त्या महिलेला ज्या लोकांनी बिनविरोध निवडून आणलं होतं त्यापैकी काही महिला तिच्याजवळ गेल्या.
सुरुवातीला महिला सदस्य आणि गावकरी महिलांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचं रुपांतर बाचाबाचीत झालं. त्यानंतर महिला ग्रामस्थानी थेट महिला सदस्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस देखील घटनास्थळी दाखल होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने वाद शांत झाला. मात्र, परिसरात तणावाचं वातावरण होतं
(Sarpanch Election in Aurgabad)