चोरांनो, किमान मंदिरातली समई परत द्या,भाविकांची कळकळीची विनंती, औरंगाबादच्या झुलेलाल मंदिरात जबरी चोरी!
औरंगाबाद येथील झुलेलाल मंदिरात शनिवारी रात्री चोरी झाली. मंदिरातीन दानपेटीसह चांदीच्या मूर्ती आणि समई चोरट्यांनी पळवली. मात्र अखंड तेवत राहणाऱ्या समईवर भाविकांची श्रद्धा असल्याने चोरांनी केवळ ही समई परत देण्याचे आवाहन भाविकांनी केले आहे.
औरंगाबादः शहरातील शहागंज (Shahaganj in Aurangabad) परिसरातील सिंधी समाजाचे कुलदैवत असलेल्या वरुणदेव जलाश्रम झुलेलाल मंदिरातील दोन चांदीच्या मूर्ती, पितळी समई आणि दानपेटीवर चोरट्यांनी मोठा डल्ला मारला. ही घटना रविवारी 5 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सिटी चौक (City Chauk police station) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिरात कायम तेवत राहणारी समईदेखील चोरांनी नेल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. चोरांनी किमान ही समई परत आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
चॅनल गेटचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश
शहागंज परिसरातील झुलेलाल मंदिर शनिवारी रात्री आठ वाजता बंद करण्यात आले. रविवारी सकाळी मंदिराचे सदस्य दीपक दर्डा हे दर्शनासाठी आले असता त्यांना चॅनल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता मंदिरातील दानपेटीसह दोन चांदीच्या मूर्ती आणि पितळी समई चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने मंदिरातील विश्वस्त व परिसरातील नागरिकांनी याची माहिती दिली.
भाविकांचे चोरांना कळकळीचे आवाहन
सिंधी समाजाचे आराध्य दैवत असलेले झुलेलाल हे पाण्यातून प्रकट झाले अशी आख्यायिका आहे. तसेच जो भाविक झुलेलाल यांच्यासमोर अखंड दिवा तेवत ठेवेल, त्याला सुख-शांती लाभेल, असा आशीर्वादही त्यांनी दिला होता. याच श्रद्धेनुसार या मंदिरात भाविकांकडून गेल्या 60 वर्षांपासून एका पितळी समईत ज्योत लावली होती. ती अखंड तेवत राहील याची काळजीही घेतली जात होती. मात्र चोरांनी ही समईच पळवल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. ज्यांनी कुणी ही चोरी केली असेल त्यांनी किमान ही पवित्र समई तरी मंदिरात पुन्हा आणून ठेवावी, असे आवाहान समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या-