विमान जमिनीला टेकण्यापूर्वीच…, अजितदादांच्या अपघातावर बड्या नेत्याला शंका, वक्तव्यानं मोठी खळबळ
अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. या अपघातावर काही नेत्यांकडून शंका व्यक्त केली जात आहे, त्यातच आता बजरंग सोनवणे यांनी देखील मोठी मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे. अजित पवार यांचं विमान हे मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरत असतानाच हा अपघात झाला आहे, विमानावरील नियंत्रण सुटून विमान जमिनीला धडकलं आणि मोठा स्फोट झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अजित पवार यांच्या अपघातावर काही नेत्यांकडून शंका व्यक्त केली जात आहे. सर्वात आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी या अपघातावर शंका उपस्थित केली होती. त्यांनी या अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या अपघातावर शंका उपस्थित करताना हे विमान हवेत अचानक तिरकं झालं, काहीतरी गडबड असायला पाहिजे असं म्हटलं होतं. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी देखील कुठं तरी पाणी मुरतंय का? हे पहावं लागेल असं म्हणत या अपघातावर शंका उपस्थित केली होती.
दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आता या अपघातावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शंका उपस्थित केली आहे. त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का? हे तपासलं पाहिजे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की विमान अपघाताचा व्हिडीओ मी पाहिला आहे, विमान जमिनीला टच होण्यापूर्वीच विमानाचा पहिला स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर विमानाच्या इंजिनच्या भागाकडचे लोक बाहेर फेकले गेले, त्यानंतर विमान जमिनीला टेकले आणि दुसरा स्फोट झाला, दोन स्फोट झाल्यामुळे या घटनेवर शंका येणार नाही का? असं सोनवणे यांनी म्हटलं आहे. तसेच सर्व माहिती समोर यायला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
