BEST Employees Strike : बेस्टचा संप कायम, प्रवाशांचे मात्र हाल, वाट पाहून थकले, सर्वसामान्यांना मोठा फटका
मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आजही दुसऱ्या दिवशी कायम आहे. विविध मागण्यांसाठी कर्मचारी ठाम असल्याने लाखो प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. सरकारने ठोस आश्वासन न दिल्याने कर्मचारी संपावर अडून आहेत. बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेत विलीन करणे, सातवा वेतन आयोग आणि रिक्त पदे भरणे या प्रमुख मागण्या आहेत. प्रवाशांना दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BEST Employees Strike : विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आजही कायम आहे.रस्त्यावरून एकही बस न धावू न देता संप यश्वी करण्यावर कर्मचारी ठाम आहेत. मात्र या संपाचा सामान्य नागरिकांना प्रवाशांना मोठा फटका बसताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत. या संपामुळे प्रवासी, सामान्य नागरिक यांची चांगलीच कोंडी झाली आहे. कालपासून सुरू झालेला संप आज दुसऱ्या दिवशीही कायम आहे. मात्र बेस्ट संपाचा कामावर जाणाऱ्या नागरिकांना मात्र चांगलाच फटका बसला असून Cst रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक प्रवासी हे बेस्ट बसच्या प्रतीक्षेत ताटकळत असलेले दिसले.
आज बेस्ट बस कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस आहे. मात्र आज देखील रस्त्यावरून एकही बस न धावू न देण्याचे ठरवत कर्मचारी 100% संप यशस्वी करण्यावरती भर देत आहेत. हा संप सुरू झाल्यावर काल एक बैठक झाली, त्यामध्ये सकारात्मक चर्चा देखील झाली. मात्र असं असलं तरीही सरकारने अजून पर्यंत याप्रकरणी कोणतेही ठोस आणि लेखी आश्वासन दिलेलं नाहीये. याच मुद्याचा आधार घेत बेस्टचे कर्मचारी आजही संप कायम ठेवण्यावर ठाम आहे. सरकार जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत बेस्टचा हा संप असाच सुरू राहणार आहे, एकही बस आम्ही रस्त्यावर धावू देणार नाही, असं यावेळी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी ठणकावून स्पष्ट केलं.
वाट पाहून प्रवासी त्रस्त
मुंबईत दररोज लाखो लोक बेस्ट बसने प्रवास करतात. कामवर जाण्यासाठी, शाळा, कॉलेजला पोहोचण्यासाठी बसचा वापर अनेकांकडून केला जातो. नुकतीच शाळा, काही कॉलेजेस सुरू झालीत. बसने ऑफीसला जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र याच दरम्यान आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांवी विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने, एरवी ज्या रस्त्यावर शेकडो बसेस धावतात, हजारो-लोखा प्रवाशांना इच्छित स्थळी नेतात, त्या रस्त्यावर आज शुकशुकाट आहे. एकही बस रस्त्यावर नसल्याने सामान्य नागरिक, प्रवासी मात्र वैतागले आहे. वाट पाहून ते त्रस्त झाले असून आता रोजचा हा प्रवास करायचा तरी कसा असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सीएसटी स्थानकातही अनेक प्रवासी लाईनीत उभे राहून बसची वाट पाहताना दिसले.
काय आहेत मागण्या ?
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामागील प्रमुख मागण्यांमध्ये बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व प्रलंबित देणी एकरकमी अदा करणे यांचा समावेश आहे. तसेच, 2016 ते 2026 या कालावधीसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, वाहतूक आणि विद्युत विभागातील कंत्राटी पद्धत रद्द करावी, अशीही त्यांची मागणी आहे. याशिवाय, बेस्टमधील रिक्त पदे तातडीने भरावीत, पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी आणि खासगीकरणाला चालना देणारे पीपीपी (PPP) मॉडेल बंद करावे, अशी भूमिका कर्मचाऱ्यांच्या समितीने मांडली आहे.
आता बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतात का, या संपावर काय तोडगा निघतो, संप कधी मिटतो आणि प्रवाशांना दिलासा कधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
