मोठी बातमी! भाजपात फूट, काँग्रेसचा मोठा दणका, घडामोडींना वेग
काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता, अजूनही काही ठिकाणी महापौरपदाची निवडणूक बाकी आहे, या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच महापालिका निवडणुकांचा निकाल लागला, या निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र जरी भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमध्ये अशी स्थिती होती की भाजपला स्पष्ट बहुमत नव्हते, महापालिकेत पक्षाचा महापौर बसवण्यासाठी त्यांना मित्र पक्षाची मदत घ्यावी लागली, चंद्रपूरमध्ये तर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि चंद्रपूर महापालिकेत भाजपचा माहापौर झाला. आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
भिवंडी महापालिकेत येत्या 20 तारखेला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या महापालिकेत देखील कोणाकडेही बहुमत नाही, इथे काँग्रेसकडे 30 नगरसेवक आहेत, तर भाजपाकडे 22 आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडे प्रत्येकी 12 नगरसेवक आहेत. अशा स्थितीमध्ये भिवंडीमध्ये आपल्याच पक्षाचा महापौर व्हावा यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस पहायला मिळत आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार आता भिवंडीमध्ये भाजपात मोठी फूट पडली आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे नारायण चौधरी यांच्या नेतृत्वातील 9 नगरसेवकांचा गट हा काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
जो पर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत निवडणूक लावली जात नाही, भिवंडीत ही असंच पाहायला मिळालं. भिवंडीत आम्ही निवडणुकांना सामोरं गेलो, इथे सर्वाधिक जागा काँग्रेसच्या निवडून आल्या आहेत. आम्हाला बहुमतासाठी 16 जागा कमी पडल्या आहेत. त्यामुळे आम्ही तिथे आता सेक्युलर फ्रंट सुरू केली आहे. यामध्ये आम्हाला राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा दिला, त्यांचे बारा नगरसेवक असल्यामुळे आता आमची संख्या 42 झाली आहे, त्यानंतर आम्ही अपक्ष उमेदवारांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला मात्र कोंडी काही फुटत नाहीये. आम्ही भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचा पाठिंबा घेणार नाही, ही आमची भूमिका होती. भाजप सोडून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा कराया तयार आहोत, नारायण चौधरी हे आधी कांग्रेस पक्षाचे होते, ते भाजपमध्ये गेले होते, ते आता सेक्युलर फ्रंटमध्ये आले आहेत, ते 9 नगरसेवकांना घेऊन आले आहेत, असं यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता, त्यामुळे काँग्रेसकडून या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली होती, त्यांनंतर या सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र आता भिवंडीमध्ये भाजपचे 9 नगरसेवक हे काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत.
