शिक्षा होताच माणिकराव कोर्टात, 30 दिवसांची डेडलाईन, नेमकं काय घडलं?
एका प्रकरणात न्यायालयानं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती, या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना, 1995 सालच्या एका प्रकरणात नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांनी शिक्षा सुनावली होती. कागदपत्रं फेरफार आणि फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण 1995 सालचं आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर कागदपत्रं फेरफार तसेच फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात न्यायालयानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली, माणिकराव कोकाटे यांच्यासोबतच त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना देखील शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेसोबतच पन्नास हजारांचा दंड देखील ठोठावण्यात आला. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जामीन मिळाल्यानं कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोकाटेंची प्रतिक्रिया
दरम्यान नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांनी शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रितसर निकाल लागलेला आहे, ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो. मला न्याय मागण्याचा अधिकार त्यामुळे मी आता वरच्या कोर्टात आपील करणार आहे. हे प्रकरण 1995 चं आहे, निकालाला उशिर झाला पण आता निकाल लागला आहे, त्यामुळे मी आता वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे, त्यामुळे मी या प्रकरणावर फार काही बोलणार नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
