दुष्काळ जाहीर होण्याआधीच भाजपकडून जोरदार पोस्टरबाजी, नवा वाद पेटला
सोलापूर भाजपने दुष्काळ जाहीर झाल्याच्या पोस्ट टाकल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर उबाठा गटाकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. आता भाजप जिल्हाध्यक्षांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

सागर सुरवसे, सोलापुर प्रतिनिधी टीव्ही९ मराठी : भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पोस्ट करण्यात आल्या होत्या. सोशल मीडियात दुष्काळ जाहीर झाल्याचे पोस्ट केल्याने विरोधकांकडून टीका होत होती. पण जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळ अद्याप जाहीर झाला नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या पोस्टवर विरोधकांकडून श्रेयवादाची टीका करत आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, आता दुष्काळ जाहीर झाल्याच्या चुकीच्या पोस्टनंतर भाजप जिल्हाध्यक्षांचे स्पष्टीकरण समोर आले आहे.
काय म्हणाले शशिकांत चव्हाण?
शेतकऱ्यांना दिलासा मिळाला या आनंदाच्या भावनेने या पोस्ट केल्या; मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळत असेल तर यात काहीही गैर नाही, असं सांगताना त्यांनी सांगितलं की, उबाठाने माझ्याविरोधात आंदोलन करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आंदोलन करायला हवे होते. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सर्वचजण चिंतेत आहेत. प्रत्येक नेता हा शेतकरी आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय. सोलापूर जिल्हा दुष्काळाची यादीत यावा अशी सर्वांची इच्छा आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत काही पोस्ट पाहिल्या आणि आनंदाच्या भरात सोशल मीडियावर ही पोस्ट केली.
त्यांनी पुढे सांगितलं की, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला या आनंदाच्या भावनेने या पोस्ट केल्या. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, त्यांचे कल्याण होत असेल तर यात काहीही गैर नाही. मात्र ही माहिती चुकीची आहे त्यामुळे तश्या पोस्ट करू नका असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. या पोस्ट आम्ही माघारी घेतल्या त्यामुळे त्यात कोणाची चेष्टा किंवा थट्टा होत नाही. उबाठाच्या मित्रांना माझे सांगणे आहे की, माझ्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आंदोलन केले असते तर आनंद झाला असता. मात्र त्यांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या सवयीप्रमाणे ते वागत आहेत. तरीही लवकरात लवकर शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर व्हावा अशी आमची मागणी असणार आहे आणि ती झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. दुष्काळ जाहीर झाल्यावर आमच्या त्याच पोस्ट असतील. सर्वांना माझे सांगणे की, दुष्काळाबाबत कोणीही राजकारण करू नये सर्वांनी एकत्रित संकटाला सामोरे जावे, असं शशिकांत चव्हाण म्हणाले आहेत.
