उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याची चर्चा, भाजप आमदाराने त्यावर स्पष्ट मत मांडतं विचारलं की..
"माझ्या मतदारसंघातील आर साऊथ, आर दक्षिण या प्रभागात जे नागरी प्रश्न आहेत, त्याच्या संदर्भात मी नेहमीच दोन महिन्याच्या अंतराने बैठका घेत असतो. त्यातलीच आज एक बैठक भाग आहे. आमचे नवनिर्वाचित नगरसेवक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत"

“एक्झिट पोलमध्ये असं दाखवलं जात होतं भारतीय जनता पार्टी सर्व दूर आघाडीवर राहणार आहे. ग्रामीण भागातली जनता सुद्धा शहरी भागातल्या जनतेप्रमाणेच या निवडणुकीत सर्वजण भारतीय जनता पार्टीची पाठीशी म्हणजेच विकासाच्या आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे, हेच या निकालातून स्पष्ट होतं आहे” अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबईतील आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे. आज जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल येत आहेत.
“संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणं म्हणजे एखाद्या सामान्य माणसाने सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. त्यांची थुंकी त्यांच्याच अंगावर पडत असते. संजय राऊत काय बडबड करतायेत याला आम्ही कधीच महत्त्व देत नाही. परमपूज्य सरसंचालकांचे देशभरामधल्या प्रमुख शहरांमध्ये प्रतिष्ठित नागरिकांबरोबर संवाद होता. त्यातला हा एक कालचा मुंबई शहरातला उपक्रम होता. त्यांनी प्रतिष्ठित लोकांच्या प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत. संजय राऊत सारख्या सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंची चाकरी करणाऱ्या माणसाला आम्ही फार किंमत देत नाही” असं अतुल भातखळकर म्हणाले.
तुम्ही कुठे अमेरिका भारत संदर्भातल्या गप्पा मारताय
आदित्य ठाकरेंनी पीयूष गोयल यांच्यावर टीका केली. त्यावर अतुल भातखळकर बोलले. “महानगरपालिकेतल्या त्यांच्या पराभवाचं आत्मचिंतन करा. तुम्ही कुठे अमेरिका भारत संदर्भातल्या गप्पा मारताय. भारत माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अत्यंत सक्षमतेने सर्व क्षेत्रात प्रगती करतोय हेच खरं आहे. तर उद्धव ठाकरेंची पोटदुखी आहे आणि महानगरपालिकेतला अपयशाच्या दुःखातून अजून बाहेर आलेली नाहीयेत. हाच त्याचा अर्थ” असं अतुल भातखळकर म्हणाले.
त्यांनी किती लक्षवेधी मांडल्या?
“विधान परिषदेवर जाणार की नाही हा मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे त्यांनी सहा वर्षात विधानपरिषदेत काय काम केलं? हे जनतेला दाखवा. त्यांची उपस्थिती किती टक्के आहे? त्यांनी किती लक्षवेधी मांडल्या? त्यांनी किती वेळा राज्यपाल अभिभाषणावर चर्चेत भाग घेतला? त्यांनी किती प्रश्न जनतेचे मांडले? हे केवळ आणि केवळ मातोश्रीचे आणि स्वतःचे इंटरेस्ट जपण्याकरता विधान परिषदेत जाण्याचा प्रयत्न करतायेत मला वाटतं. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे” असं अतुल भातखळकर म्हणाले.
