नगर जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय अन्यायकारक, अजित पवारांच्या सूचनेनुसार घाट, सुजय विखेंचा आरोप

| Updated on: Oct 05, 2021 | 7:42 AM

अहमदनगरला जिल्ह्यातील 61 गावांत लावण्यात आलेला कडक लॉकडाऊनला खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी विरोध केलाय. हा निर्णय अन्यायकारक असून भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.

नगर जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय अन्यायकारक, अजित पवारांच्या सूचनेनुसार घाट, सुजय विखेंचा आरोप
सुजय विखे पाटील आणि अजित पवार
Follow us on

अहमदनगर : अहमदनगरला जिल्ह्यातील 61 गावांत लावण्यात आलेला कडक लॉकडाऊनला खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी विरोध केलाय. हा निर्णय अन्यायकारक असून भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर गंभीर आरोप करत अजित पवारांच्या सूचनेनुसार पुणे आणि नाशिकला वाचविण्यासाठी नगर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आल्याचा आरोप विखेंनी केलाय.

नगर जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय का घेण्यात आला, कुणी घ्यायला लावला याचं उत्तर  जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांनी द्यावं, असंही सुजय विखे म्हणाले. त्याचबरोबर जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मतदारसंघातच सर्रासपणे लॉकडाऊन लावलं जात असून सत्ताधारी पक्षांच्या मतदार संघात लावला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

तसेच बाकी जिल्ह्यात आकडे लपवले जात असून कुठल्याही सत्तेतील पक्षाकडून अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आलाय. तर येत्या दोन दिवसांत याचा फेरविचार झाला नाही, तर भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं विखे पाटलांनी म्हटलंय.

नगर जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाऊन

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचं चित्र आहे. परंतु तिसऱ्या लाटेचं संकटही अजून कायम आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये आजपासून लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेत. या आदेशानुसार मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आले आहेत. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश दिले असून त्यांच्या आदेशानुसार आजपासून 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांत लॉकडाऊन करण्यात आलाय.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा यात समावेश आहे. आजपासून 13 ऑक्टोबरपर्यत हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आलाय.

दिवसभरात आज नगरमध्ये 424 नव्या कोरोना रुग्णांची भर

अहमदनगर जिल्ह्यांत सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव आढळून आलाय. दिवसभरात आज नगरमध्ये 424 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. ज्या गावांत 10 पेक्षा जास्त रुग्ण आहेत, अशा गावांमध्ये हा लॉकडाऊन लादण्यात आलाय. जिल्ह्यात जवळपास दररोज 500 ते 800 च्या घरात रुग्ण सापडत असून, पॉझिटिव्हिटी रेटही 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

(BJP MP Sujay Vikhe Patil Allegation DCM Ajit Pawar Over Lockdown 61 Villages in ahmednagar District of Maharashtra)

हे ही वाचा :

नगरमध्ये 61 गावांमध्ये कडक लॉकडाऊन, फक्त मेडिकल, दवाखाना सुरु, बाकी ‘शटर डाऊन’