Raj Thackeray-Modi : राज ठाकरेंनी मुद्देसूद भूमिका मांडताच भाजपकडून लगेच प्रत्युत्तर, ‘मोदींना सल्ला देण्याऐवजी, तुम्ही..’
Raj Thackeray-Modi : "पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ?" असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सलग दोन दिवस काही महत्वाची आवाहनं केली आहेत. एक म्हणजे पेट्रोल-डिझेलचा वापर जपून कार, पुढचं वर्षभर सोनं खरेदी टाळा आणि WFH अशी आवाहनं त्यांनी देशातील जनतेला केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भूमिकेनंतर विरोधकांना एक मुद्दा मिळाला आहे. त्यांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. सरकारची आर्थिक धोरण फसल्याची टीका काही जणांकडून सुरु आहे, तर हे मोदी सरकारच अपयश असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून मोदी यांच्या राजकीय आणि आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांनी मोदी सरकारला कोंडीत पकडणारे प्रश्न विचारले आहेत. त्यावर आता भाजपने त्यांना उत्तर दिलं आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा असं सांगत आहेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ?” असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. “2008 ला पुढे 2011-2012 अरब स्प्रिंगच्या वेळेस, 2013-2014 च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती 2022 आणि 2023 च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव 90 ते 100 डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी 3 ते 4 वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
‘राज ठाकरे यांच्या पोटात दुखायला लागलं’
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीच आवाहन केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटात दुखायला लागलं. खरंतर राज ठाकरे यांनी मोदींना सल्ला देण्याऐवजी आपल्या पक्षाच्या बाबतीत, पक्षाच्या धैय्य धोरणांसाठी, पक्ष वाढीसाठी एवढ मोठं टि्वट लिहिल असतं, तर जास्त फायदा झाला असता. परंतु राज ठाकरे आपल्या पक्षाची झालेली वाताहात पहायला तयार नाहीत. ते पंतप्रधान मोदींना सल्ला देत आहेत” अशी टीका नगरसेवक आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली.
