
Devendra Fadnavis On BMC Election Result : राज्यात महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. 15 जानेवारी रोजी एकूण 29 महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत मुंबईची महानगरपालिका सर्वाधिक चर्चेत होती. मुंबईची पालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी चांगलीच ताकद लावली होती. दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला होता. आता निकाल लागल्यानंतर मुंबईत महायुतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा, शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय झाल्यानंतर मुंबईत महापौर कोण होणार? कोणत्या पक्षाचा होणार? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठे भाष्य केले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढला आहे.
राज्यातील बहुसंख्य महापालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजपाने मुंबईत विजयोत्सव आयोजित केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील यावेळी उपस्थित होते. फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुंबई महापालिका तसेच इतर महापालिकांमधील विजय हा जनतेला आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे, असे सांगितले. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत केली. त्याचेच हे फळ आहे, असेही फडणवीस सांगायला विसरले नाहीत. पुढे बोलताना त्यांनी विजयी उमेदवारांनी आता जबाबादारीने काम करावे. भ्रष्टाचार न करता लोकांची सेवा करावी. आपल्यावर आता जबाबदारी आलेली आहे, असा सल्लाही निवडून आलेल्या भजपाच्या कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी बोलताना त्यांनी मुंबईचा महापौर नेमका कोण होणार? याबाबत थेट भाष्य केले नाही. परंतु भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौर भाजपाचाच होणार का? असे विचारले जात असताना फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. मुंबई महापालिकेत आपला विजय झाला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर होईल, असे फडणवीस म्हणाले आहेत. त्यांनी महापौर कोण होणार? हे थेट सांगणे टाळले आहे. त्यामुळेच आता महापौरपदासाठी नेमकं कोणाचे नाव निश्चित केले जाणार, याचा सस्पेन्स वाढला आहे.