देवेंद्र फडणवीसांचा तातडीचा फोन कॉल, मुंबई पालिका जिंकताच घडामोडी वाढल्या, दिला मोठा संदेश!
राज्यात 29 महापालिकांचा निकाल लागला आहे. या निकालात बहुसंख्या जागांवर भाजपा सरस ठरली आहे. मुंबईतही महायुतीची सत्ता आली आहे. असे असतानाच फडणवीस यांनी केलेल्या एका फोन कॉलची सगळीकडे चर्चा आहे.

BMC Election Result : राज्यात एकूण 29 महापालिकांचा निकाल आता जवळजवळ स्पष्ट झाला आहे. बहुसंख्य महापालिकांत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने विजयी पताका फडकवली आहे. येथे उद्धव ठाकरे यांच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुंबई महापालिकेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली होती. सभा, कॉर्नर बैठका, रॅली यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती अशी रणनीती भाजपाने आखली होती. त्याचाच परिणाम म्हणून आता मुंबईत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, आता मुंबईत महायुतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोन कॉल केला आहे. या फोन कॉलची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नेमका कोणाला कॉल केला?
मुंबईतील निकाल जवळपास स्पष्ट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक कॉल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कॉल त्यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांना केल आहे. अमित साटम यांनी भाजपाचा विजय व्हावा यासाठी संपूर्ण मुंबई पिंजून काढली होती. विशेष म्हणजे ठाकरेंनी केलेल्या टीकेला ते जशास तसे प्रत्युत्तर देत होते. आता मुंबईचा निकाल लागल्यानंतर फडणवीस यांनी अमित साटम यांना कॉल केला आहे. तसा एक व्हिडीओ समोर आला आहे.
देवेंद्र फडणवीस कॉलमध्ये नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस हे फोन कॉलमध्ये अमित साटम यांच्याशी बोलताना दिसत आहेत. ‘अमित तुमचं खूप खूप अभिनंदन. नाही नाही चांगलं झालं. आता काहीही चिंता करायचं कारण नाही. तुम्ही फार सुंदर काम केलं. तुमचं खूप अभिनंदन आहे. आता आपण जबरदस्त करूया,’ असे देवेंद्र फडणवीस या कॉलदरम्यान म्हणाले आहेत.
मुंबईत नेमका निकाल काय लागला?
मुंबई पालिकेत एकूण 227 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यातील 95 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर 30 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. ठाकरे बंधूंचा एकूण 75 जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. मनसेला 9 तर ठाकरे यांच्या शिवसेनेला 66 जागा मिळू शकातत. विशेष म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 15 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. इतर आणि अपक्षांचा एकूण 11 जागांवर विजय होऊ शकतो.
