
आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा भाग समोर आला. यामध्ये भाजपचीही एक्स्पायरी डेट आहे असा सूर दोन्ही बंधुंनी आवळला. काल त्यांनी भाजपसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. तर आज नाशिकमध्ये दोन्ही बंधुंची संयुक्त सभा होणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोड शो आणि सभांचा धुरळा उडाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याप्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
बीड शहरातील अंकुश नगर भागात 6 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील पाईप लाईनचे काम करणाऱ्या हर्षद उर्फ दादा शिंदे यांची गोळ्या मारून आणि धारदार शस्त्राने वार करून विशाल सूर्यवंशी याने हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे. या गोळीबाराचे आणि त्यानंतर धारदार शस्त्र घेऊन पाठलाग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शहरात विकास कामांच्या आश्वासनांचे होर्डिंग लावण्यात आलेत. या होर्डिंग्जवरून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपावर टीका केलीय. विकासाच्या नावावर सांगलीकरांना भाजपकडून गाजर हलवा दाखवण्यात येत असल्याची टीका विश्वजीत कदम यांनी केली आहे.
नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरेंची भेट
नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर पर्यावरण प्रेमींच्या शिष्टमंडळाने घेतली राज ठाकरे यांची भेट
तपोवन येथील वृक्षतोड, कपिला नदी अतिक्रमण संदर्भात केली दहा मिनिटे चर्चा
तपोवन येथील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध
उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी अजित पवारांची प्रचार सभा
संत गाडगेबाबा समाधी मंदिर समोरील प्रांगणात अजित पवारांची सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता अजित पवारांची अमरावती जाहीर सभा
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शहरात विकास कामांच्या आश्वासनांचे होर्डिंग लावण्यात आलेत. या होर्डिंग्जवरून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपावर टीका केली आहे.विकासाच्या नावावर सांगलीकरांना भाजपकडून गाजर हलवा दाखवण्यात येत आहे. अडीच वर्ष राज्यात भाजपचे सरकार, देशात भाजपाचे सरकार आहे. एका वर्षांपूर्वी भाजपचे खासदार, आमदार होते मग विकास का केला नाही? असा खडा सवाल देखील विश्वजीत कदम यांनी भाजपाला केला आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीबाबत बोलताना अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके म्हणाले की, महाविकास आघाडीचा विचार म्हणजे सेक्युलर विचार. शिव-शाहू, फुले, आंबेडकर यांना बरोबर घेऊन चालणारा विचार आणि त्या विचाराच्या पाठीशी नगर शहर राहील ही मला खात्री आणि विश्वास आहे. शहराला शांतता प्रिय आणि विकासाकडे घेऊन जायचं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे. धाराशिवमध्ये बोलताना त्यांनी म्हटले की, एकत्रित निवडणूक लढणं व एकत्रित पक्ष म्हणून येणं हा याच्यामध्ये फरक आहे. आम्ही एनडीए चे घटक पक्ष असून आमचं काम एकत्रितपणे योग्य चालत आहे.
जळगावात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर पदोन्नतीचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अर्थ व लेखा विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ही कारवाई केली आहे. विक्रम सुरेश पाटील आणि संतोष लक्ष्मण पाटील अशी निलंबित करण्यात आलेल्या लेखा विभागाच्या वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सह्यायकांची नावे आहेत.
आजचा दिवस इराणसाठी निर्णयाचा महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. रझा पहलवी यांनी इराणी नागरिकांना आज रात्री 8 वाजता पुन्हा घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. कालपेक्षा जास्त गर्दी जमण्याची अपेक्षा आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला न थांबताच थेट मुंबईच्या दिशेने निघाले. उशीर झाल्याने एकनाथ शिंदे थेट मुंबईकडे निघाले. सभेच्या समोरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले मात्र सभास्थळी आले नाही. गर्दी कमी असल्याने एकनाथ शिंदे गेले अशी चर्चा सुरू आहे.
राज ठाकरे नाशिक ओझर विमानतळावर पोहोचले आहेत. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आलं. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील ओझर विमानतळावर येणार आहे. आज संध्याकाळी नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा होणार आहे.
पुणे शहराला संस्कृती आणि परंपरा लाभलेली आहे, असं सांगत एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला आहे. पुण्यासारख्या शहरात दादागिरी करून निवडून येता येत नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना पुण्यातील दादागिरी संपून टाकणार आहे. तसेच पुण्याच्या विकासात शिवसेना सिंहाचा वाटा उचलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभेत सांगितलं.
जम्मू आणि काश्मीरमधील कठुआमध्ये पुन्हा एक संशयित दहशतवादी दिसला आहे. तो रात्री उशिरा चकमकीच्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका निवासी घरात घुसला. कठुआच्या लहारी पराल भागातील एका घरातून या दहशतवाद्याने रात्री 1 वाजता अन्न आणि ब्लँकेट चोरले. कुटुंबातील सदस्यांनी दहशतवादी सशस्त्र असल्याचे सांगितले. माहिती मिळताच, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी परिसराला वेढा घातला.
भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात मंगळवारीही सुरू राहील. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर न्यायालयाने आज आपली सुनावणी पूर्ण केली.
कल्याण पूर्व–पश्चिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विविध ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी साऊथ स्टाईल पोस्टर्स लावत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सभेनंतर केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी कल्याण पूर्व आणि पश्चिमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दोन भव्य जाहीर सभा होणार आहे. महायुतीचा 122 पैकी 118 जागा जिंकण्याचा दावा आहे.त्यामुळे शिंदे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षामधील दांड्या मारणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आचारसंहिता कक्षात नियुक्ती असूनही कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या एकूण 22 कर्मचाऱ्यांना नोडल अधिकारी जयश्री माळी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या कर्मचाऱ्यांना 24 तासांत लेखी खुलासा सादर करणे अनिवार्य केलं आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी वारंवार संपर्क करूनही हजर होत नसल्याने निवडणूक प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाल्याने कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या संविधानात लिहिले आहे की केवळ मुस्लिम समाजाचा उमेदवार पंतप्रधान बनू शकतो. पण भारताच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेबानी आंबेडकरांनी कोणालाही पंतप्रधान होण्याची तरतूद केली आहे. एकदिवस बघा हिजाब घालणारी मुलगी देशाची पंतप्रधान होईल, असं एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
अजित पवार यांना मतं म्हणजे मोदीला मत आहे. मोदी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे त्रिमूर्ती आहेत, असं एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी सोलापुरात म्हणाले.
मनसे नेते मनीष धुरी यांची नाराजी कायम. “मी नाराज शंभर टक्के आहे. आम्हाला देखील दुसरी खेळी खेळता येते. सोमवारपर्यंत जर ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युती धर्माचे पालन केले नाही तर मोठा निर्णय घेणार. आमची नाराजगी उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यावर नाही,तर स्थानिक ठाकरे शिवसेना नेत्यांवर आहे” असं मनीष धुरी म्हणाले.
“भाजपं दादांवर आरोप करते आणि सोबतही काम करते. सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि पिंपरी-चिंचवड पुरता एकत्र. आमच्या कुटुंबात कधीही अंतर आलं नव्हतं. स्थानिक निवडणुका संपल्यावर महाराष्ट्रातल्या युतीचा विचार करु” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबटे व रानडुकरांच्या वाढत्या वावरामुळे ऊसाचे क्षेत्र लक्षणीयरीत्या घटले. नैसर्गिक जंगल क्षेत्र कमी झाल्याने बिबट्यांचा थेट ऊस शेतात आश्रय. ऊसतोड हंगामात कामगार व त्यांच्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण, रानडुकरांकडून पिकांचे मोठे नुकसान. बिबटे व रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची शेतकरी व ऊसतोड कामगारांची जोरदार मागणी.
“महाविकास आघाडीचा विचार म्हणजे सेक्युलर विचार. शाहू,फुले,आंबेडकर यांना बरोबर घेऊन चालणारा विचार, आणि त्या विचाराच्या पाठीशी नगर शहर राहील ही मला खात्री आणि विश्वास आहे. शांतता प्रिय म्हणून नगर शहराकडे गेल्या अनेक वर्षापासून पाहिलं जात होतं. मात्र मधल्या कालखंडामध्ये या शहराला एक वेगळ्या विचारधारेला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. आता एक संधी आहे. शहराला शांतता प्रिय आणि विकासाकडे घेऊन जायचं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा” असं खासदार निलेश लंके म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मतदारांबाबत केलेल्या एका विधानावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. अशोक चव्हाण यांचा उल्लेख आदर्श चव्हाण असा केला आहे. त्यांनी मतदारांची किंमत मटणापुरती मर्यादित करून जनतेचा अपमान केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. पक्ष बदलल्यामुळे चव्हाणांची नियत आणि संस्कृती दोन्ही बदलली आहे. काँग्रेसमध्ये असताना ते असे नव्हते, मात्र भाजपमध्ये जाताच त्यांना स्वतःच्या वडिलांच्या प्रतिमेचाही विसर पडला आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. स्वतःची किंमत कमी करून आणि घोटाळे करून ते भाजपमध्ये गेले आहेत, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी अशोक चव्हाणांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मध्यवर्ती माजिवाडा परिसरात रंगलेल्या ‘बॅनर वॉर’ने ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका बाजूला महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकत असताना, दुसरीकडे त्यांना थेट आव्हान देणारे ठाकरे बंधूंचे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेल्या या बॅनरवर ‘मनसे आणि शिवसेनेला विजयी करा’ असे आवाहन करण्यात आले असून, ठाणेकरांच्या प्रलंबित समस्यांवरून सत्ताधाऱ्यांना बोचरी टीका करण्यात आली आहे.
राज्याच्या आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात आपली शक्ती पणाला लावणार आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरात त्यांच्या धाडसी दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याची सुरुवात कात्रज चौकातील भव्य जाहीर सभेने होणार असून, येथे शिंदे विरोधकांवर काय प्रहार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेनंतर शिंदे यांचा पर्वती परिसरात जंगी ‘रोडशो’ पार पडणार असून, याद्वारे ते मतदारांशी थेट संवाद साधतील. या झंझावाती दौऱ्याचा समारोप कसबा विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेने होणार आहे. कसब्यातील राजकीय समीकरणे पाहता शिंदे यांची ही सभा अत्यंत कळीची मानली जात असून, आजच्या या दौऱ्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
राज ठाकरे यांनी ५० खोक्यांवर बोलण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी साडे नऊ लाख कोटी रुपये कोठून जमा केले, याचा जाब विचारावा, असे आवाहन नवनाथ बन यांनी केले. ज्या काँग्रेसने मुंबई मिळवण्यासाठी लढा देणाऱ्यांच्या छातीवर गोळ्या घातल्या, आज उद्धव ठाकरे त्याच काँग्रेससोबत सत्तेसाठी गेले आहेत, ही खेदजनक बाब आहे. तसेच, भाजप हा बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचा पक्ष असून केवळ खुर्ची वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीचा जनता आगामी काळात टप्प्याटप्प्याने कार्यक्रम करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुंबई महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप भाजप नेते नवनाथ बन यांनी केला. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्यात १०० दिवस तुरुंगात जाऊन आलेले ‘डबल सर्टिफायड’ लुटारू आहेत, त्यांना भाजपवर टीका करण्याची पात्रता नाही, अशा शब्दांत त्यांनी राऊतांना सुनावले.
सांगली-मिरज येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला आश्वस्त करत मिरज दर्ग्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचे जाहीर केले. माझ्याकडे अल्पसंख्याक विभागाचे खाते आहे, त्यामुळे मंदिर असो वा दर्गा, ज्या पवित्र ठिकाणी आपण नतमस्तक होतो, त्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. या श्रद्धास्थानांच्या ठिकाणी विकासकामांच्या माध्यमातून आम्ही आमची बांधिलकी सिद्ध करू, असे प्रतिपादन पवार यांनी केले. तसेच, शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि विकासाची गती वाढवण्यासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.
नाशिक मध्ये आलेल्या मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची तपासणी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योग, बांधकाम व्यवसायीक यासह विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उदय सामंत नाशिकला आले होते. पोलीस परेड मैदानावर सामंत यांचे हेलिकॉप्टर लँड झाले होते. त्यानंतर सामंत यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.
मिरजमध्ये अजितदादांची सभा सुरु असताना घोषणाबाजी करण्यात आली. अजितदादांच्या NCP चे उमेदवार आझम काझींच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरु केली. आज रात्री 1 वा. काझींना शहर सोडण्याचे आदेश देण्यात आलेत.
बीड शहरातील सहयोग नगर गणपती मंदिर जवळ असलेल्या स्क्रॅप गोडाऊनला पहाटे अचानक आग लागल्याने यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशामक दलासह नागरिक आणि नगरसेवकांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली आहे. मात्र यात संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले आहे.
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अटल सेतूचा निर्णय झाला… गतिशील सरकारने स्वप्न सत्यात उतरवलं… चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूवर निशाणा साधला…
ज्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात, ज्यांच्या उमेदवाराचा प्रचार बॉम्बस्फोटातले आरोपी करतात. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामुला जे आपल्या पक्षात प्रवेश देतात ते अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करतात याच्यापेक्षा दुसरी कुठलीही गोष्ट हास्यास्पद असू शकत नाही. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला अमित साटम यांनी थेट प्रत्युत्तर दिलं.
भाजप म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान , स्वत: कोरडे पाषाण. भाजपला चोऱ्यामाऱ्या कराव्या लागत आहेत – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली.
सोलापूर – भाजपकडून बंडखोर 28 कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई. -सोलापूर महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणे पदाधिकाऱ्यांना भोवले आहे. माजी उपमहापौर, 4 माजी नगरसेवकांसह 28 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात लढणाऱ्यांवर पक्षाकडून कडक कारवाई करण्यात आल्याचे शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांनी सांगितलं.
गेल्या आठ दिवसापासून गायब झालेल्या थंडीचे नाशिक जिल्ह्यात जोरदार आगमन. निफाडचा किमान तापमानाचा पारा घसरला. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथे 6.1 अंश सेल्सिअस तर रुई येथे 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद…
४८७ ग्रॅम अॅम्फेटामाइन ड्रग्ज पावडर जप्त. जप्त ड्रग्जची अंदाजे किंमत २३ ते २४ लाख रुपये. अमली पदार्थ विक्रीच्या संशयातून पितापुत्रासह तिघांना अटक आरोपी : मुन्ना कोल, शांती कोल व १९ वर्षीय मुलगा अमर कोल. मिलिटरी गेटसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज साठा आढळला. फॉरेन्सिक तपासणीत पांढरी पावडर ‘अॅम्फेटामाइन’ असल्याची पुष्टी. लष्करी अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासुन भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद राहणार आहे. पुढील वर्षी त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भिमाशंकरला विकास आराखड्यातुन विविध विकास कामे पार पडत आहे त्यामुळे भाविकांच्या गर्दीचा परिणाम विकास कामांवर होऊ नये.
चालत्या फिरत्या आलिशान कारमध्ये सुरू होते गर्भ लिंग निदान केंद्र. बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारात गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात केंद्रावर पोलिसांची कारवाई. गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरासह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. सदरची कारवाई बार्शी ग्रामीण पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.
परळीमध्ये शिवसेनेच्या एमआयएम सो.. एकनाथ शिंदे जी, परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची जी युती झाली आहे, ती पाहून आता तुमच्या ‘बंड’ आणि ‘तत्त्वांच्या’ गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता, आता तुम्ही थेट ‘एमआयएम-वासी’ झालात? ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच जमलं तुमचं ! हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? परळीतल्या या नव्या ‘सत्तेच्या संसाराचा’ चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. ही नवी युती मुबारक असे या ट्विट मध्ये शेवटी दानवे म्हणाले आहेत
महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान दिल्लीत सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस इकडे काय बोलतात त्याला महत्त्व नाही. वर दोघेजण बसलेत त्यांच्या मनात वेगळेच सुरू असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरे यांनी पंजाब आणि तेलंगाणा येथील जिल्हा परिषद निवडणुकीचा दाखला देत पेपरबॅलेटवर निवडणुका घेतल्या की निकाल भाजपच्या बाजूने लागत नसल्याचे मोठे विधान केले. या राज्यात भाजप सातव्या आणि चौथ्या क्रमांकावर गेल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला. काल पहिल्या भागातही दोन्ही बंधुंनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आसूड ओढले होते.
मुंबईवर सातत्याने परराज्यातून लोंढे येत आहे. त्यामुळे कितीही जरी योजना राबविल्या तरी ताण येतोच. मुंबईवर येणारे लोंढे थांबवण्याची गरज राज ठाकरे यांनी व्यक्त केली. इतर राज्यात त्यावर नियंत्रण आहे. पण मुंबईचा विषय आला की मात्र देशात कुणाला कुठंही जाण्याचा हक्क असल्याचे सांगण्यात येत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
धारावीपासून इतर योजनांचा उल्लेख करत, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजपला मुंबई अदानीयुक्त करायची असल्याचा गंभीर आरोप केला. दोन्ही बंधुंनी संयुक्त मुलाखतीत भाजपवर मोठा घणाघात केला.
भाजपा आणि मिध्यांमध्ये नुरा कुस्ती सुरू आहे. निवडणुकीनंतर ते एकत्र दिसतील. शेवटी सत्ता आणि दिल्लीची भीती त्यांना वाटते असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही दोघे एकत्र आल्यावर शिंदे यांच्या शिवसेनाचा वापर मराठी मतांमध्ये फुट पाडण्यासाठी वापरत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईचा महापौर मराठीच होईल असे उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मुलाखतीत दावा केला. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला. भाजप मुंबईचा महापौर हिंदू होईल असे म्हणते. मग मराठी माणूस हिंदू नाही का, त्यापेक्षा मराठी महापौर होईल असे ते का म्हणत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या वेळी ‘मोठा भाऊ’ होण्याच्या निर्धाराने आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली आहे.मागील २५ वर्षांचा इतिहास पाहता भाजप नेहमीच शिवसेनेच्या तुलनेत कमी जागांवर निवडणूक लढवत असे.मात्र शिवसेना फुटीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपने आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी ९२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या वेळच्या भाजपा व्यूहरचनेत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘सोशल इंजिनिअरिंग’ आणि ‘ओबीसी कार्ड’ हे आहे. शहरात सुमारे ६ लाख ओबीसी मतदार असून ही मते मिळवण्यासाठी भाजपने अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे.केवळ राखीव जागांवरच नव्हे, तर अनेक सर्वसाधारण जागांवरही ओबीसी उमेदवार देऊन पक्षाने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.