दोन्ही शिवसेना पक्ष संपण्याचा मार्गावर? संभाजीनगरातल्या निकालामुळे धक्का; फायनल आकडेवारीने खळबळ!
छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक असा निकाल समोर आला आहे. येथे भाजपा हा मोठा पक्ष ठरला आहे. तर एमआयएम या पक्षाने एकूण 33 जागांवर विजय मिळवाला आहे. दोन्ही ठाकरे गटांना मात्र जबर धक्का बसला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Election Result : राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 15 जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. दरम्यान या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची महापालिका चर्चेच्या केंद्रस्थानी होती. कारण या ठिकाणी भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेन, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, काँग्रेस हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, आता या ठिकाणी भाजपाने एकहाती सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालाची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरात कोणाला किती जागा मिळाल्या?
छत्रपती संभाजीनगरात एकूण 115 जागांसाठी मतदान झाले होते. 15 जानेवारी रोजीच्या मतदानानंतर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण 58 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही चांगलाच जोर लावला होता. शिवसेनेची मात्र येथे निराशा झाली आहे. शिवसेनाला फक्त 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर फक्त 6 जागा मिळाल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा 4 जागांवर विजय
एमआयएम पक्षाने मात्र येथे मोठी कमाल केली आहे. या पक्षाला एकूण 33 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा एका जागेवर विजय झाला असून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचा एकूण 4 जागांवर विजय झाला आहे. भाजपाने एकूण 115 पैरी 58 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे येथे भाजपाचाच महापौर होणार आहे.
ठाकरे आणि शिंदे या दोघांनाही फटका
कधीकाळी छत्रपती संभाजीनगर हे शहर शिवसेना या पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होते. आता मात्र महापालिका निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा किमान 25 जागांवर विजय होईल असे मानले जात होते. परंतु शिंदे यांनाही तशी किमया साधता आली नाही. उद्धव ठाकरे यांच्याासाठी हा निकाल तर फारच धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष फुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे नुकसान झाले असून भाजपाला मात्र चांगला फायदा झाला आहे.
