मदरशाच्या नावाखाली मुलांची तस्करी, पोलिसांनी केली ५९ मुलांची सुटका
Crime News : रेल्वे पोलिसांनी तस्कारांवर मोठी कारवाई केली आहे. लहान मुलांची तस्कारी करणारे रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 59 मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे.
जळगाव : रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांनी मुलांच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट उघड केले आहे. मुलांची तस्करी उघड होऊ नये म्हणून त्यांना मदरसाचा ड्रेस परिधान करुन त्यांची तस्करी केली जात होती. या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाची कसून चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. या 59 मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे. मुलांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. या प्रकारामुळे तस्करीचे मोठे रॅकेट उघड होणार आहे.
काय आहे घटना बिहार राज्यातून 59 मुलांना सांगली येथील मदरशामध्ये तस्करीसाठी घेऊन जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. या तस्कारीचा कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा ड्रेस घालण्यात आला होता. बिहार राज्यातून पूर्णिया येथून लहान मुलांना दानापूर-पुणे एक्स्प्रेसने बाल तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस भुसावळ यांना मिळाली. मग पोलिसांनी सापळा रचला.
दानापूर पुणे ही गाडी भुसावळ स्थानकावर येताच कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून 8 ते 15 वयोगटातील 29 मुलांना रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतले. तसेच मनमाड रेल्वे स्थानकावर 30 मुले साप़डली आहेत. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयीताला शिताफीने पकडून रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
चार आरोपींना अटक
रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांची तस्करी होत असल्याची टीप पोलिसांना एका स्वयंसेवी संस्थेने दिली होती. त्यानुसार ही कारवाई केली गेली आहे. यामधील २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत जळगावला तर मनमाड येथे सुटका झालेल्या ३० बालकांना चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ नाशिकमध्ये पाठवले. पोलिसांनी चार तस्करांवर भादंवि 370 नुसार गुन्हा नोंदवला आहे. तर एका तस्कराविरोधात 370 IPC मनमाडमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मुलांची वैद्यकीय तपासणी केली आहे. मुलांची ओळख पटवल्यावर त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे.