पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ आधीच, अभाविप आणि एनएसयुआयमध्ये जुंपली…
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात शुल्का संदर्भात चुकीच्या गोष्टी सावित्रीच्या लेकींकडून वदवून घेतले जात आहे. खालच्या पद्धतीचे राजकारण काँग्रसेला करावे लागत आहे, असा आरोप अभाविपने केला आहे.

पुण्यात उद्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज कार्यक्रम होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाआधीच भाजपाची विद्यार्थी संघटना अभाविप आणि काँग्रेसचे युवक संघटन एनएसयुआय यांच्यात जुंपली आहे. अभाविप संघटनेच्या लोकांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे. तर अभाविप संघटनेने काँग्रेस विद्यार्थ्यांकडून फी संदर्भात चुकीचे वदवून घेत घाणेरडे राजकारण करत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या दौऱ्याआधी झालेल्या या गोंधळामुळे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टिवार देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुण्यात उद्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ (Chhatron Ki Goonj Pune) हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी युवकांशी संवाद साधणार आहेत. मात्र त्याआधी काँग्रेसचे एनएसयुआ आणि भाजपाचे छात्र संघटन एबीव्हीपीमध्ये येथे हमरीतुमरी झाली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हेदेखील पोहोचले आहेत. एनएसयुआयने अभाविपच्या कार्यकर्त्यांंनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
एबीव्हीपीचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले आणि त्यांनी काही तरुणांना धमकावल्याचा, तसेच राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंजच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्यासाठी धमकावल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे. या गोंधळानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येथे जमल्याने दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि आरोप प्रत्योराप सुरु झाले आहेत.
दोन अनाथ मुलींना कोंडून ठेवले – विजय वडेट्टिवार
सीओईपीमधील या दोन अनाथ मुलींना कोंडून ठेवले. अभाविपच्या गुडांनी त्या अनाथ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकत त्यांना मारहाण केली. कार्यक्रम उद्धवस्थ करण्यासाठी हे षडयंत्र रचले गेल्याचा आरोप यावेळी विजय वडेट्टिवार यांनी केला आहे.
सीओईपीमधील ज्या विद्यार्थीनीने फीच्या विरोधात तक्रार केली होती. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तिने फी संदर्भात आपले आरोप चुकीचे असून ते आपल्याकडून वदवून घेतल्याचे सांगत कॉलेज प्रशासनाची माफी मागत आहे असा या विद्यार्थींनीचा व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आला आहे.
दरम्यान, सीओईपी सारख्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान विद्यापीठातील शुल्का संदर्भात चुकीच्या गोष्टी सावित्रीच्या लेकींकडून वदवून घेतल्या जात आहेत. खालच्या पद्धतीचे राजकारण काँग्रसेला करावे लागत आहे, काँग्रेसच्या राहुल गांधींना ही छात्रों की गुंज ऐकू येत नाही का असा आरोप अभाविपने केला आहे. कोटा, डेहराडून आणि प्रयागराज नंतर आता पुण्यात राहुल गांधी ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी येणार आहेत.
