CM फडणवीस संतापले… फोन करून अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं, हॉस्टेलमधील मुलींचा क्षणात प्रश्न सुटला
CM Fadnavis Angry : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. मात्र हॉस्टेलमधील मुलींच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांना रागवताना किंवा चिडताना तुम्ही खुप कमी वेळा पाहिले असेल. मात्र हॉस्टेलमधील मुलींच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. विदर्भात तापमान 45 अंशांवर गेले असताना वसतिगृहातील मुलींना त्रास सहन करावा लागत होता, मुलींनी अधिकाऱ्यांकडे कुलरची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर हा मुद्दा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे पोहोचला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही तासांमध्ये हा प्रश्न मार्गी लावला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हॉस्टेलमधील मुलींना उकाड्याचा त्रास
ही गोष्ट आहे नागपूरच्या बेसा येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहाची. विदर्भाचा उन्हाळा काय असतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. तापमान 40 ते 45 अंशांवर पोहोचलेलं. बाहेर अंगाची लाही लाही करणारी गरमी आणि आत वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये अक्षरशः भट्टीसारखी परिस्थिती. त्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या मुली घरापासून दूर राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत्या, तर काही कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिथे राहत होत्या. स्वतःचं भविष्य घडवण्याचं स्वप्न घेऊन त्या तिथे आल्या होत्या. पण सध्या त्यांच्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे उकाडा.
मुख्यमंत्र्यांना समजताच अधिकाऱ्यांना विचारला जाब
रात्रभर झोप नाही, अस्वस्थपणा इतका की काही मुलींना त्वचेचे त्रास सुरू झाले होते. कृपया कूलर लावून द्या ही विनंती वारंवार करूनही त्यांना प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळायचं की तांत्रिक अडचणी आहेत. दिवसामागून दिवस गेले. त्रास वाढत होता. पण विचारलं तर उत्तर तेच. शेवटी ही बाब स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि इथून पुढे जे घडलं, त्याची अपेक्षा ना त्या अधिकाऱ्यांना होती, ना त्या मुलींना. विषय समजताच देवेंद्रजी अक्षरशः संतापले. अधिकाऱ्यांना त्यांनी कडक शब्दांत जाब विचारला.
CM फडणवीस संतापले
आतापर्यंत कुलर का लावले नाही? एक काम करा आधी तुमच्या कार्यालयातले फॅन आणि कूलर बंद करा, मग कळेल त्या मुली काय सहन करतायत. ह्या एका फोन कॉलनंतर विदर्भातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. आवाजात प्रचंड संताप होता. समोर शांतता होती. अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते पण त्या एका फोननंतर संपूर्ण यंत्रणा हलली. ज्या तांत्रिक अडचणी अनेक दिवस सुटत नव्हत्या, त्या काही तासांत सुटल्या. बेसा वसतिगृहात कूलर पोहोचले.
संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा निर्णय
पुढे फडणवीस यांनी विचार केला की, ही समस्या फक्त एका वसतिगृहापुरती मर्यादित कशी असणार ? त्यांनी तत्काळ निर्णय घेतला आणि एक-दोन नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सरकारी वसतिगृहांसाठी कूलर्स उपलब्ध करून दिले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न देवाभाऊंच्या एका फोनमुळे सुटल्यामुळे त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्यांनी देवेंद्रजींना पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली. खरंच खूप भावनिक पत्र होतं. काही मुलींनी प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानले.
