गणेश नाईकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं उत्तर, एका वाक्यात विषय संपवला
मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंड प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दोन दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नवी मुंबईतील भूखंडांवरून जोरदार हल्लाबोल केला होता. ‘हे भूखंड बिल्डरांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले. मला लाज वाटते, मी ज्या मंत्रिमंडळामध्ये आहे, त्याच मंत्रिमंडळातल्या नगरविकास खात्यातील लोकांनी असा कर्मदरिद्रीपणा केला. माझा राग शांत व्हायची जर तुमची इच्छा असेल तर सिडकोकडून, एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला विकासासाठी, जनतेच्या हितासाठी जे भूखंड देऊ केले आहेत, ते लगेच देण्याची व्यवस्था करावी. ज्या गोष्टीसाठी मी आमदार झालो, मंत्री झालो त्या विकासाच्या गोष्टी मी जर जनतेला देऊ शकत नसेल तर ते मंत्रिपद काय चाटायचं आहे का? असा सवाल गणेश नाईक यांनी केला होता.
दरम्यान गणेश नाईक यांच्या आरोपांनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान त्यानंतर आता गणेश नाईक यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गणेश नाईकांना काल श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. गणेश नाईक यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे?
आपण कोणावरती बोलतो, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? त्यांना एक प्रकारची आसुया आहे. शिंदे साहेब जेव्हा शाखाप्रमुख होते, तेव्हा हे मंत्री होते. त्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले तरी देखील ते तिथेच आहेत, आणि ते कोणामुळे झाले मंत्री? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव केला नसताना तर त्यांना मंत्रिपदही मिळालं नसतं. शिंदे साहेबांवर तुम्ही टिका करता, ते बिचारे काही बोलत नाहीत, ते कामातून उत्तर देतात. डॉ. श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिला होता.
