एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं तर ते सेफ असतं, कारण…, फडणवीसांचं मोठं विधान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावरून मिश्किल वक्तव्य केल्याचं पहायला मिळत आहे. मी आणि एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्रिपदाची आदला-बदली करत असतो. कधी मी मुख्यमंत्री तर कधी ते मुख्यमंत्री असतात, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

मंगळवारी बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदावरून मिश्किल वक्तव्य केल्याचं पहायला मिळत आहे. मी आणि एकनाथ शिंदे आम्ही मुख्यमंत्रिपदाची आदला-बदली करत असतो. कधी मी मुख्यमंत्री तर कधी ते मुख्यमंत्री असतात. शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहेच की मी आणि आमचे एकनाथराव शिंदे आम्ही आदलाबदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, तर कधी ते मुख्यमंत्री असतात. कधी मी उपमुख्यमंत्री असतो तर कधी ते उपमुख्यमंत्री असतात. त्यामुळे आज माझ्या जागी मुख्यमंत्र्यांच्या जागी ते भाषण करणार आहेत. आणि त्यांना जर मुख्यमंत्रिपद दिलं तर ते सेफ असतं, कारण ते परत करतात, आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री करतात, हे मला माहिती असल्यामुळे मी रिस्क घ्यायला मागे -पुढे पाहिलेलं नाहीये, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा घराबाहेर पडले, त्याचा आनंद आहे, असा खोचक टोला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. हे चांगलं आहे, विरोधी पक्षांचं ते कामच आहे. पहिल्यांदा उद्धवजी घराबाहेर पडले आहेत, याचा मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलिकडे काहीच करू शकत नाहीत. मी तर यापूर्वीच सांगितंल आहे, विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा, अन् हजार रुपये मिळवा, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
