सततच्या पराभवामुळे कदाचित खर्गेंच्या डोक्यावर परिणाम झाला असावा; फडणवीस प्रचंड संतापले, थेट म्हणाले…
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

मोठी बातमी समोर येत आहे, सध्या देशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र त्यातच आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी म्हटलं आहे. ते चेन्नईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. एआयएडीएमके पक्ष नरेंद्र मोदींसोबत कशी काय युती करू शकतो, ते एक दहशतवादी आहेत, त्यांचा समानतेवर विश्वास नाही असं खर्गे यांनी म्हटलं होतं. दरम्यान खर्गे यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे, भाजप नेत्यांकडून मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खर्गे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
सततच्या पराभवामुळे कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा, त्यामुळे राष्ट्रभक्त, देशभक्त आणि ज्यांनी सुरक्षित व अधुनिक भारत तयार केला, त्या मोदीजींबद्दल त्यांनी अशाप्रकारचे अपशब्द वापरले आहेत. काँग्रेसची नीतीच राहिली आहे. हा तोच काँग्रेस पक्ष आहे, ज्यांनी मोदीजींना मौत का सौदागर असं म्हटलं होतं. परंतु ते जेव्हा -जेव्हा मोदींवर हल्ला करतात त्या-त्या वेळी जनता त्यांना उत्तर देते आणि त्या-त्या वेळी जनता त्यांना पराभूत करते. देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांनी केलेलं विधान याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी आपलं वक्तव्य परत घेऊन, जाहीर माफी मागवी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करतो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
रवींद्र चव्हाण यांचाही हल्लाबोल
दरम्यान दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी ट्विट करत निशाणा साधला. ‘कावीळ झालेल्याला सगळं जगच पिवळं दिसतं! ज्यांच्या राजवटीत दहशतवाद्यांना रान मोकळं मिळालं होतं, त्यांना आता दहशतवादमुक्त नव्या भारतातही सगळे दहशतवादीच दिसतायत. खर्गे साहेब, दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी दहशतवाद्यांवरच्या ‘मोहब्बत’ने सजलेला काँग्रेसचा इतिहास एकदा वाचाच !’ असं ट्विट रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे.
