ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन भाजप, शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये जुंपली, कल्याणचं राजकारण तापलं

| Updated on: Jan 19, 2021 | 10:31 PM

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर कल्याण-डोंबिवलीतील राजकारण प्रचंड तापलं आहे (Dispute between Gopal Landge and Raju Patil)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन भाजप, शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये जुंपली, कल्याणचं राजकारण तापलं
Follow us on

ठाणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर कल्याण-डोंबिवलीतील राजकारण प्रचंड तापलं आहे. शिवसेना, भाजप आणि मनसेकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. या दावे आणि प्रतिदाव्यांमधूनच आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजपने कल्याण-डोंबिवलीतील सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी आगरी समाजाला डावलल्याने शिवसेनेला फटका बसल्याचा दावा केलाय. मात्र, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या दाव्याला खोटं ठरवत, मनसे आमदाराच्या आरोपांना काही आधार नाही, असं म्हटलं आहे (Dispute between Gopal Landge and Raju Patil).

कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्याचा निकाल काल जाहीर झाला. प्रत्येक पक्षाने निकालापश्चात विजयाचे दावे केले आहेत. डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोशल मिडियावर एक यादी टाकली, ज्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत हे नमूद करण्यात आलं होतं.

या यादीनुसार कल्याण लोकसभा मतदारसंघातील 14 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला 139 जागांपैकी केवळ 25 जागा मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपला 66 जागा आणि राष्ट्रवादीला 37 तर मनसेला 10 जागांवर समाधान मानावे लागले, असं या यादीत म्हटलं आहे (Dispute between Gopal Landge and Raju Patil).

भाजप आमदारांचा हा दावा शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी फेटाळून लावला आहे. “शिवसेनेला मागच्या पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. ज्यांनी हा दावा केला आहे. त्यांनी त्यांच्या लेटरहेडवर असे लिहून द्यावे. अन्यथा आम्ही आमचे सदस्य समोरसमोर दाखविण्यास तयार आहोत”, असं आव्हान लांडगे यांनी दिलं आहे.

दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “नवी मुंबई विमानतळास दी. बा. पाटलांचे नाव न दिल्याने आणि करवले गावात डंम्पिंग टाकण्यात आल्याने आगरी समाज नाराज आहे. आगरी समाजाविरोधात भूमिका घेतल्यामुळे शिवसेनेला निवडणूकीत फटका बसला”, असा दावा मनसेच्या राजू पाटीलांनी केला.

मनसेच्या या आरोपांवर लांडगे यांनी प्रतिक्रिया दिली. “मनसेचे आरोप आत्मसंतुष्टीसाठी आहे. त्यांचा भूलथापांना समाज कधी बळी पडलेला नाही. प्रत्येकवेळी प्रत्येक निवडणुकीत समाज शिवसेनेसोबत आहे आणि असेल”, असं प्रत्युत्तर गोपाळ लांडगे यांनी दिलं.

संबंधित बातम्या :

‘काही लोकांनी प्रतिष्ठा पणाला लावली, तरीदेखील भाजपला यश’, गणपत गायकवाडांचा शिवसेनेला टोला