Uday Samant : अंबादास दानवे शरीराने ठाकरे गटात पण मनाने…उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य
Uday Samant : "संजय राऊत यांनी जर पत्रकार परिषदा घेतल्या नाहीत तर यूबीटीचं अस्तित्व देखील जाणवणार नाही आणि त्यामुळे ते त्यांची भूमिका मांडत असतात" असं म्हणत उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे सेनेला टोला लगावला.

उद्धव ठाकरे गटाला चार वर्षात दुसरा मोठा राजकीय झटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत. 9 पैकी त्यांचे 6 खासदार पक्ष नेतृत्वावार नाराज आहेत. त्यामुळे ते वेगळा गट स्थापन करणार अशा नुसत्या चर्चाच नाही, तर राजकीय हालचाली सुद्धा दिसत आहे. ठाकरे गटाकडून हा सर्व पैशांचा खेळ असल्याचा आरोप केला जातो. फुटणारे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतील असं बोललं जातय. या दरम्यान आता या सगळ्या घडामोडींवर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दिल्लीत झालेल्या यूबीटीच्या खासदारांच्या बैठकीला तीन खासदार उपस्थित होते. सहा कुठे गेले हे मलाही कळत नाही” असा उदय सामंत यांनी ठाकरेंच्या नेत्यांना मिश्किल टोला लगावला.
ठाकरेंचे खासदार शिवसेनेत येणार यामुळे स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत, यावर उदय सामंत बोलले की, ‘निर्णय होऊ द्या, त्यानंतर बोलणं योग्य राहील’. “शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे उच्च पदावर बसावेत अशी आमची इच्छा आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही त्यांचे नेते उच्च पदावर असावेत असं वाटतं, मात्र अंबादास दानवे हे देखील एकनाथ शिंदे यांनी उच्च पदावर बसावं असं म्हणत असतील, तर यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे मला कळत नाही” अस सचूक वक्तव्य उदय सामंत यांनी केलं.
काही लोकांना पोटशूळ उठतो
संजय राऊत यांच्या टीकेला सुद्धा उदय सामंत यांनी उत्तर दिलं. “एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व सर्वमान्य आहे, याची प्रचिती महाराष्ट्रातल्या पुढार्यांना येत आहे. त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठतो” असं म्हणत संजय राऊत यांना टोला लावला आहे. “यूबीटी खासदार आणि एकनाथ शिंदे बैठकी बाबत एकनाथ शिंदे यांचा जो काही निर्णय येईल, त्याच्यानंतरच आपण बोलू” असं सामंत म्हणाले.
चिडण्यापेक्षा पेक्षा आत्ममंथन करा
येणाऱ्या किती खासदारांना मंत्रिपद दिले जाणार? यावर उदय सामंत यांनी मला काही माहिती नाही असं म्हणत उत्तर देणं टाळलं. ठाकरे भेटण्यासाठी वेळ देत नाहीत यावर अरविंद सावंत चिडले. त्यावर उदय सामंत म्हणाले की, “यामध्ये चिडण्यासारखं काही नाही. एखादी व्यक्ती सांगत असेल तर ते समजून घेण्यासारखं आहे. चिडून जे काही घडलं आहे, ते थांबवता येत नाही. आम्ही ज्यावेळी उठाव केला.आमची देखील हीच भूमिका होती.चिडण्यापेक्षा पेक्षा आत्ममंथन केलं पाहिजे” असं उदय सामंत म्हणाले.
