Sanjay Raut : जगाला हादरवणाऱ्या एपस्टिन सेक्स स्कँडलमध्ये केंद्रातील मंत्री? डायरेक्ट नाव घेतले… संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ
एपस्टिन सेक्स स्कँडलने जगभरात खळबळ उडवली आहे. याच प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रातील मंत्री हरदीप पुरी यांच्या नावाचा थेट उल्लेख केला आहे. पुरी यांनी पदाचा गैरवापर करत एपस्टिनच्या लोकांना व्हिसा दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. मोदी सरकारने कारवाई करून पुरींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे. यामुळे भारतीय राजकारणातही भूकंप येण्याची शक्यता आहे.

एपस्टिन सेक्स स्कँडलमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. अनेक देशातील प्रमुख आणि मोठ्या उद्योजकांची या सेक्स स्कँडलमध्ये नावे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये तर मोठा राजकीय भूकंप आला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांची खुर्ची यामुळे हलायला लागली आहे. हे धक्के जगाबरोबरच भारतालाही बसण्याची शक्यता आहे. या सेक्स स्कँडलमध्ये केंद्रातील एका मंत्र्याचं नाव आल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. या मंत्र्याचं नाव घेत त्यांनी थेट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मीडियाशी बोलताना राऊत यांनी हा आरोप केला आहे.
आपण एपस्टिन फाईलमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचा या लोकांशी संबंध असल्याचं उघड झालं आहे. मोदी सरकार सेक्स सँकडलमध्ये अडकलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. एपस्टिन सोबत या सरकारचे मंत्री किती नाजूक आणि मधूर संबंध ठेवून होते हे तुम्ही पाहिलं आहे. हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपस्टिनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा दिला आहे. हे मोदींच्या संमतीने झालं नसेल का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
त्या मंत्र्यावर कारवाई करा
एपस्टिन फाईलवर आम्ही अधिक बोलणार नाही. त्यावर बोलायला राहुल गांधी सक्षम आहेत. मोदींनी त्या मंत्र्यांवर कारवाई करावी. बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला? बिल गेट्स यांच्या पत्नीला याबद्दल कळलं तेव्हा तिने नवऱ्याशी घटस्फोट घेतला. त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या मंत्र्यांवर झालेलं असताना ते अजूनही आपल्या देशावर कारभार करत आहेत. हा यातील फरक समजून घ्या, असं संजय राऊत म्हणाले.
मोदींवर हल्ला ? हे बकवास आहे…
मोदींवर हल्ला करण्याचा संसदेत प्रयत्न होणार होता, असा दावा केंद्रीय सचिवालयाकडून करण्यात आला आहे. त्यावरही राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. हे बकवास आहे. मोदींच्या आधीपासून आम्ही संसदेत आहोत. मोदी दिल्लीत नंतर आले. आम्हाला संसद माहीत आहे. संसदेची आचारसंहिता माहीत आहे. नियम माहीत आहे. मोदींना कोणापासून धोका आहे? काँग्रेसपासून? ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात मोठं योगदान दिलं, तुरुंगवास भोगला, त्यातूनच ही पार्लमेंट तयार झाली. त्या काँग्रेसपासून मोदींना धोका आहे, असं म्हटलं जात असेल तर ते अत्यंत बकवास आहे, असं पलटवार त्यांनी केला.
केंद्र सरकारपासून देशाला धोका
या देशाला कुणापासून धोका असेल तर तो मोदी सरकारपासून धोका आहे. काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधींना अतिरेकी हल्ल्यात गमावलं. राजीव गांधींना अतिरेकी हल्ल्यात गमावलं. देशासाठी. सर्व धोके पत्करून गांधी कुटुंब जनतेत गेलं. त्यांच्यावर हल्ला झाला. मोदी किंवा भाजपचे नेते असं करताना दिसतात का? त्यांनी देशासाठी बलिदान दिलंय असं कधी झालंय का? मोदींपासून देशाला जो धोका निर्माण झाला त्यामुळे असंख्य निरपराध माणसं मारली गेली. काश्मीरपासून मणिपूरपर्यंत. हे राजकारण करत बसले, असा हल्ला त्यांनी चढवला.
हे तर डरपोक सरकार
मोदींपासून देशाला आता धोका निर्माण झालाय. देश अमेरिकेचा गुलाम होण्याचा. ज्या पद्धतीने मोदींनी व्यापार केला आहे, त्यामुळे देश गुलाम झाला. देश गुलाम झाला अमिरेकेचा. त्यावर ओम बिर्लांनी बोललं पाहिजे. खासदार वेलमध्ये उतरले म्हणून पंतप्रधानांना धोका निर्माण झाला असं म्हणणं हस्यास्पद आहे. राजीव गांधीपासून मनमोहन सिंगांपर्यंत भाजप आणि विरोधकांनी असं आंदोलन केलं होतं. पण त्यावेळी ते म्हणाले नाही की, आम्हाला खासदारांपासून धोका आहे. हे डरपोक सरकार आहे. या देशातील पंतप्रधान जगातील डरपोक नंबर 1 आहे. कसली छप्पन इंचाची छाती? खासदारांना घाबरता? आणि म्हणे छप्पन इंचाची छाती. तुम्ही ट्रम्प समोर गुडघे टेकले आहेत, अशी टीका त्यांनी केली
