संभाजीनगरातील हर्सुल तलावात एकाच वेळी 4 तरुणांचा बुडून मृत्यू, रविवारची ठरली शेवटची सहल
छत्रपती संभाजीनगरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील हर्सुल तलवात एकाच वेळी चार जण बुडाले आहेत. या चारही जाणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेनंतर आता संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar : रविवार हा सुटीचा दिवस आहे. या दिवशी बाहेर जाऊ धम्माल मस्ती करायचं अनेकजण ठरवतात. त्यासाठी काही जण ट्रेकिंग, लाँग ड्राईव्हला जातात. तर काही लोक एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आजचा दिवस आनंदात घालवतात. काही लोकांना तलावाच्या ठिकाणी जायलाही आवडते. परंतु आनंद लुटण्यासाठी तलावात जाऊन पोहण्याचे धाडस कधीकधी जीवावर बेतू शकते. याचीच प्रचिती देणारी एक अत्यंत दुर्वैवी घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. छत्रपती संभाजीनगरात असलेल्या हर्सुल तलवात एकाच दिवशी चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
एकाच वेळी बुडाले चार जण
या घटनेननंतर संपूर्ण छत्रपती संभाजीनगरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरालगत असलेल्या हर्सुलच्या तलावात या चौघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे चौघेही पोहण्यासाठी हर्सुल तलवात गेले होते. सुरुवातीला तीन तरुण बुडाले असल्याचे सांगितले जात होते. ही घटना समोर आल्यानंतर तेथील लोकांनी लगेच अग्निशामक दल आणि पोलिसांनी याबाबत कळवले. पोलीस तसेच अग्निशामक दलानेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ घटनास्थळ गाठले. या तिघांचे तातडीने बचावकार्य करण्यात आले तिघांनाही बाहेर काढण्यात आले. त्याच वेळी तलावाच्या दुसऱ्या बाजूलाही आणखी एक तरुण बुडाल्याची माहिती बचाव पथकाला समजली.
दोघांची ओळख पटली, दोघांच्या नातेवाईकांचा शोध सुरू
त्यानंतर तलावाच्या दुसऱ्या बाजूला बुडालेल्या तरुणालाही बाहेर काढण्यात आले. तलावाच्या बाहेर काढेपर्यंत या चौघांचाही मृत्यू झाला होता. चार तुरणांपैकी अफान खान आणि आदिल शेख अशी दोघांची नावे आहेत. उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे. चौघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या चारही तरुणांचा सहलीचा शेवटचा रविवार ठरला आहे. दरम्यान, फिरायला गेल्यानंतर उत्साहाच्या भरात जीवावर बेतण्यासारखे कोणतेही कृत्य करू नका, असे आवाहन केले जात आहे.
