राष्ट्रवादीने खरंच राजीनाम देण्यास सांगितलंय का? अखेर इद्रीस नायकवडी यांचा मोठा खुलासा, सगळंच सांगितलं…
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवडी यांना पक्षाने राजीनामा देण्यास सांगितलं आहे, अशी बातमी समोर आली होती, त्यावर आता त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्याकडे पक्षाने आमदारकीचा राजीनामा मागितल्याची बातमी समोर आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी यांनी इद्रीस नायकवडी यांची भेट घेतली आणि तुम्ही राजीनामा द्यावा अशी पक्षाची सूचना आहे, असं इद्रीस नायकवडी यांना सांगण्यात आल्याचं देखील समोर आलं होतं. परंतु इद्रीस नायकवडी यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. माझा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मागितला नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे, त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. इद्रीस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार आहेत.
नेमकं काय म्हणाले इद्रीस नायकवडी?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रीस नायकवडी यांच्याकडे पक्षाने आमदारकीचा राजीनामा मागितल्याची बातमी समोर आली होती. यावर आता स्वत: इद्रीस नायकवडी यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘माझा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मागितला नाही, या सगळ्या वावड्या आहेत आणि या सगळ्या अफवा आहेत. काही पक्षातील नेते आहेत, ज्यांना बोलता येत नाही, असे लोक या वावड्या उठवत आहेत. जरतरच्या विषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही. आज तसा काही विषय नाही. जेव्हा विषय येईल तेव्हा बोलणार, राज्यपाल नियुक्त असल्याने 6 वर्षांचा कार्यकाळ असतो. अजितदादांनी काही जबाबदाऱ्या दिल्यात, त्या जबाबदाऱ्या पार पाडतोय, असा खुलासा यावेळी इद्रीस नायकवडी यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मी त्रास करुन घेणारा कार्यकर्ता नाही, मी काम करणारा माणूस आहे. या सगळ्याकडे लक्ष देणारा नाही. मी महापौर असतानाही अशाचप्रकराच्या राजीनाम्याच्या वावड्या उठवल्या होत्या. अजितदादांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर १० मिनिटात दादांसोबत जाण्याचा मी निर्णय घेतला. त्यानंतर अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी दादांनी मला मोठ्या विश्वासाने दिली. रिझल्ट ओरियंटेडेट वर्क करण्याची मला सवय आहे. त्याची अजितदादांना जाण होती, त्यामुळे अजितदादांनी मला न मागता विधानपरिषद दिली, विधिमंडळात मला जबाबदारी दिली, असं यावेळी नाईकवडी यांनी म्हटलं आहे.
30 तारखेला माझ्या कार्यालयाच्या समोरच माझा एक छोटासा अपघात झाला होता. डॉक्टरांनी प्रवास करू नका असं सांगितल्याने गावी गेलो होतो. काहीच विषय नाही, त्यामुळे लपवण्यासारखे काहीही नाही. मी येईल त्याला सामोरे जाणारा कार्यकर्ता आहे, असंही यावेळी नाईकवडी म्हणाले.
