एसआयटी तपासाला वेग येत नसेल तर…, भोंदू अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारेंची मोठी मागणी, थेट दिला इशारा
राज्यात सध्या अशोक खरात प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात मोठी मागणी केली आहे, तसेच त्यांनी यावेळी बोलताना अंजली दमानिया यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे.

सध्या अशोक खरात प्रकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 17 फोन कॉल्स झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता अंजली दमानिया यांच्याकडे अशोक खरात याचा सीडीआर कसा आला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी मागणी केली आहे, तसेच त्यांनी यावेळी बोलताना अंजली दमानिया यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात एसआयटीच्या तपासाला वेग येत नसेल तर सीआयडीकडून चौकशी करावी अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अंधारे?
कोणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या गेल्या, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या. असं जर खरच झालं असेल तर ही लोक कोण आहेत? या मागे कोणाचा हात आहे? अशोक खरात याच्या मार्फत हे कोण करत आहे , याची माहिती घेतली पाहिजे. एसआयटी तपासाला वेग येत नसेल तर या प्रकरणात सीआयडीची नियुक्ती करावी अशी आमची मागणी आहे, असं यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच आर्थिक स्त्रोत का तपासले जात नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सीडीआर बाहेरचा माणूस काढतो, मग एसआयटीला का काढता येत नाहीत? या प्रकरणात वेगवान पाऊले उचलली गेली पाहिजेत. नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागतील, कारण हा लेकीबाळीचा प्रश्न आहे, असा इशाराही यावेळी सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला आहे. सगळ्या मुद्द्यांचे निरासरण झाले पाहजे, दीपक केसरकर यांनी फोन केले की नाही हे पाहिले पाहिजे, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, असंही यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.
