IMD Weather Update : मोठं संकट, पाऊस पुन्हा धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा मोठा इशारा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, परंतु पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह तब्बल 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला, पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. परंतु आता गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. कमी वेळेत अति पाऊस झाल्याने राज्यातील काही भागांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांना पुराचा वेढा पडला, त्यामुळे मोठं नुकसान झालं. मात्र दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणजे या पावसामुळे अनेक धरणांच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून चिंता वाढवणारा इशारा देण्यात आला आहे. तब्बल 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार सोमवारी 13 जुलै रोजी देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश बिहारसह तब्बल 17 राज्यांमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच या काळात 80 ते 85 किमी प्रति तास एवढ्या प्रचंड वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये तर हवामान आणखी खराब होऊ शकतं. त्यामुळे या काळात नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहान देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळण्याच्या देखील घटना घडू शकतात. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असंही आयएमडीने म्हटलं आहे. तर काही भागांमध्ये अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे.
या राज्यांना हाय अलर्ट?
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि आसाम या 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांमध्ये अतिवृष्टीची देखील शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 80 ते 85 किमी एवढा राहणार असल्याचंही हवामान विभागाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
सध्या जरी राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी देखील सोमवारपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.