2019 साली अजितदादांनीच आधी भाजपात पाठवलं, राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून एक गट वेगळा करत भाजपसोबत गेले आणि सत्तेत सहभागी देखील झाले. पण २०१९ मध्ये अजित पवार यांनीच आम्हाला भाजपमध्ये जाण्यासाठी सांगितलं होतं असा खुलासा एका नेत्याने केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

Ajit pawar : 2019 साली आम्हाला अजितदादांनीच आधी भाजपात पाठवलं आणि त्यानंतर गेल्यावर्षी ते स्वतः भाजपसोबत आले असं विधान धाराशीवच्या मल्हार पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. 2019 पासूनच अजितदादांच्या डोक्यात वेगळा प्लॅन होता का असा प्रश्न यावरुन ओमराजे निंबाळकरांनी विचारल आहे. आधी अर्चना पाटलांनी अजित पवारांऐवजी घड्याळाचं चिन्ह लावून फक्त मोदींचा फोटो ठेवल्यानं वाद झाला. नंतर आता त्यांचे पुत्र मल्हार पाटलांनी अजित पवारांबाबतचं मोठं विधान केलंय. 2019 ला अजित पवारांनीच आम्हाला आधी भाजपात पाठवलं., आणि त्यानंतर ते भाजपसोबत आल्याचं मल्हार पाटलांनी म्हटल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.
पद्मसिंह पाटील होते शरद पवारांचे कट्टर समर्थक
आता पार्श्वभूमी समजून घेऊयात. कधीकाळी पद्मसिंह पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जायचे. राष्ट्रवादीत असताना दिर्घकाळ अनेक मोठी पदं पद्मसिंह पाटलांनी भूषवली. पण 2019 च्या विधानसभेत विकासाचं कारण देत पद्मसिंह पाटील, त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील भाजपात गेले. यांच्यातलं नातं-गोतं कसं आहे. ते समजून घेऊयात.
शरद पवार आणि पद्मसिंह पाटील हे कधीकाळी चांगले सहकारी होते. पद्मसिंह पाटलांच्या बहिण या अजित पवारांच्या पत्नी म्हणजे सुनेत्रा पवार आहेत. म्हणजे राणा जगजितसिंह अजित पवारांचे भाचे लागतात.
2019 ला केला होता भाजपात प्रवेश
2019 ला पद्मसिंह पाटील कुटुंबानं भाजपात प्रवेश केला. 2023 ला अजित पवारांचा गट सत्तेत भाजपसोबत गेला. आणि 2024 ला राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन तिकीट मिळवलं. 2019 ला राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश करताना राणा जगजितसिंहांना अश्रू अनावर झाले होते. शरद पवार दैवत आहेत, मात्र विकासासाठी भाजपात जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं.
मात्र त्यानंतर पद्मसिंह पाटलांनी भाजप प्रवेशामागे पक्षाअंतर्गत कुरबुरीचंही कारण दिलं होतं. पुढे मविआ सत्तेत आल्यानंतर पद्मसिंह पाटील पुन्हा परतू शकतात का., यावर पवारांनी दिलेलं उत्तर चर्चेत राहिलं. तूर्तास धाराशीव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांचं विधान चर्चेत राहिलं. त्यानंतर त्यांचे पुत्र मल्हार पाटलांचं विधान चर्चेत आहे.