Indurikar Maharaj : पोरांनो, तुमचा वापर फक्त ‘युज अँड थ्रो’ म्हणून… इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
कीर्तनकार इंदुरीकर महाराज अकोल्यातील नव्या विधानांमुळे पुन्हा चर्चेत आहेत. त्यांनी तरुणांना दंगलीत न पडण्याचा, 'युज अँड थ्रो' न होण्याचा सल्ला दिला. तसेच, परीक्षा काळात शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घालण्याची मागणी केली

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकार महाराज हे सतत चर्चेत असताताच. काही महिन्यांपूर्वी ते त्यांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे, तो थाट, त्यासाठीचा खर्च यामुळे वादात सापडले होते, त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांनीही टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावर बरेच वाद, आरोप वगैरेही झाले. हेच इंदुरीकार महाराज आता पुन्हा चर्चेत आले आहेत, ते त्यांच्या नव्या विधानामुळे. अकोल्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी केलेली काही वक्तव्य सध्या गाजत आहेत. पोरांनो दंगलीच्या भानगडीत पडू नका, गरीबांचे पोर आत गेले, मोठ्यांचे बाहेर… तुमचा वापर फक्त ‘युज अँड थ्रो’ म्हणून असं म्हणत त्यांनी तरूण मुलांना तळमळीचं आवाहन केलंय.
एवढंच नव्हे तर परीक्षा काळात राज्यातील सर्व शाळांत मोबाईलवर बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. एखादी मुलगी दरिद्री मुलासोबत पळून गेली अन आयुष्यभर सुखी झाली असेल तर तिने मला सांगावं, 6 महिने तिच्या घरात भांडी घासेन असं वक्तव्य देखील इंदुरीकरे महाराज यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे चर्चा सुरू झाली असून नवा वाद निर्माण होऊ शकतो.
तुमचा वापर फक्त ‘युज अँड थ्रो’ म्हणून..
तरुणांसह शेतकऱ्यांच्या पोरांना प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकरांनी एक तळमळीचं आवाहन केलं आहे. पोरांनो मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका, आजकाल पेनात कॅमेरा आहेत. टपरी पेटवाताना किंवा दंगलीत तुम्ही कुठे दिसले तर, 10 वर्षांची शिक्षा आहे. कारण, आतापर्यत दंगलीमध्ये गरीबांचे पोर आत गेले, मोठ्याचे गेले नाही, कधी जाऊ देणारही नाहीत. ते तुमचा वापर फक्त ‘युज अँड थ्रो’ म्हणून करणार, असं कीर्तनकार इंदूरकरांनी म्हटलं आहे. तर आज कोणतही काम करायला पोलीस वेरिफिकेशन दाखला लागतो, म्हणून पाया पडतो सर्व पोरांच्या,कोणीही दंगलीच्या भानगडीत पडू नका, असेही ते म्हणाले.
‘मोबाईल’वर बंदी घातली पाहिजे’
यावेळी त्यांनी परीक्षांच्या काळात मोबाईल बंदीचीही मागणी केली. 12 वी आणि 10 ची परीक्षा तोंडावर आहे, मुलं काहीच अभ्यास करेना. त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये आहे. मग परीक्षावेळी खिडकीतून चिट्ठी घ्यायच्या आणि शिक्षकांना दम द्यायचा, आजच्या 40 टक्के मुलांची अशी परिस्थिती आहे असं इंदुरीकर म्हणालेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये नियमावली आणली पाहिजे. आणि परीक्षा काळात ‘मोबाईल’वर बंदी घातली पाहिजे’, अशी मागणी देखील इंदुरीकर महाराजांनी केली आहे.
तर पुढचे 6 महिने आपण तिच्या घरी धुणीभांडी घासणार
यावेळी इंदुरीकर महाराज यांनी मुलींबद्दल वादग्रस्त विधान करीत थेट ‘खुलं चॅलेंज’ दिलं आहे. आजकालच्या मुली प्रेमात हुशार नव्हे तर दरिद्री पोर निडवतात. ते पोर विहिरीवरच्या मोटरी, केबलच्या तार आणि मोटरसायकलच्या पार्ट चोरणारी असतात. जर एखादी मुलगी दरिद्री मुलासोबत पळून गेली आणि ती आयुष्यभर सुखी झाली असेल, अशा एकीने येऊन सांगावं, असं झालं असेल तर पुढचे 6 महिने आपण तिच्या घरी धुणीभांडी घासणार असं चॅलेंज त्यांनी दिलं. आज आईच्या डोळ्यात पाणी आणि वडिलांची मान खाली घालवणारी मुलगी कधीच सुखी राहू शकणार नाही असंही इंदुरीकर म्हणालेत.
आज 31 वर्ष आयुष्य लोकांच्या शिव्या खाण्यात गेलं आहे. प्रत्येक माणसाने शिव्या घातल्यात, म्हणून थोड्याकरिता कशाला बंद घालायाचं, असं ठरवलंय. पण खरं बोलतोय म्हणून लोक आपल्या बोकांडी बसतात. आज हायवेच्या बाजूने ज्यांना जमिनी विकल्या, त्यांनी हॉटेल टाकले, आणि जमिनी विकणारे त्याच हॉटेलात मजूर झालेत. तर दुसरीकडे पाहलं तर निम्मे ग्रामपंचायत सदस्य अंगठे बहाद्दर आहेत, असही इंदुरीकर म्हणालेत.
