महायुतीत ऑल इज नॉट वेल? भाजपच्या बंद दाराआड बैठकीने राजकीय घडामोडींना वेग, नक्की काय घडतंय?
जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भाजप नेताओंची महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेनेच्या दाव्यानंतर भाजपने जळगावच्या जागेसाठी आग्रह धरला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भाजपच्या प्रमुख आमदार आणि खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. बंद दाराआड ही बैठक पार पडली. तब्बल दोन तास चाललेल्या या गुप्त बैठकीमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
दोन तास खलबते; भाजप आमदारांचा जागेसाठी आग्रह
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला जळगावचे भाजप आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार स्मिता वाघ प्रामुख्याने उपस्थित होत्या. जळगाव विधान परिषदेची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपनेच लढवावी, अशी आग्रही मागणी सर्व लोकप्रतिनिधींनी गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. जळगावात भाजपची ताकद मोठी असून पक्षाकडे तब्बल १० पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्यास तयार असल्याची माहिती या बैठकीत समोर आली.
शिवसेनेच्या दाव्यामुळे भाजप सावध
जळगाव विधान परिषदेच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने देखील आपला प्रबळ दावा ठोकला आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही जागा शिवसेनेला मिळावी आणि प्रतापराव पाटील यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी जाहीरपणे केली आहे. घटक पक्षाने थेट जागेवर हक्क सांगितल्यामुळे भाजपने तातडीने ही अंतर्गत बैठक घेऊन आपली रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीत कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. मात्र जळगावच्या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचे स्पष्ट संकेत दिले. आम्ही राज्यात महायुती म्हणून एकत्र लढत आहोत. जागावाटपासंदर्भात वरिष्ठ नेत्यांचे बारीक लक्ष असून तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा करतील. एकूण १७ जागांच्या वाटणीचा प्रश्न आहे, कोण कुठून लढणार यावर गुणवत्तेच्या (Merit) आधारावर जागावाटप केले जाईल. जळगावची जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही नक्कीच आग्रही आहोत आणि आमच्याकडे १० लोक इच्छुक आहेत. आम्ही पुण्यात आणि ठाण्यातही जागा मागत आहोत. प्रतापराव पाटील यांच्या संदर्भात अशी कोणतीही थेट चर्चा अद्याप झालेली नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.
दरम्यान आता जळगाव विधानपरिषदेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहेत. त्यामुळे आता महायुतीचे वरिष्ठ नेते या जागेचा तिढा कसा सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
