लग्न लागल्यावर तुम्ही बाजा लावणार याला काय अर्थ? गुलाबराव पाटील यांची नाराजी समोर… गिरीश महाजनांना करुन दिली ती आठवण

Gulbrao Patil on Girish Mahajan: मंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक होता. पण ही जागा भाजपकडे गेली. तर बंडखोरीमुळे अनेक ठिकाणी पेच निर्माण झाला आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्यापूर्वी गुलाबराव पाटील यांनी महाजनांवर नाराजी व्यक्त केली आहे.

लग्न लागल्यावर तुम्ही बाजा लावणार याला काय अर्थ? गुलाबराव पाटील यांची नाराजी समोर... गिरीश महाजनांना करुन दिली ती आठवण
गुलाबराव पाटील, गिरीश महाजन
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 04, 2026 | 12:22 PM

किशोर पाटील, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील धुसफूस समोर आली. काही ठिकाणी जागा वाटपावरून आणि बंडखोरींवरून अखेरच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला आहे. नाशिक आणि जळगाव येथील जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच दिसून आली. तर आज अखेरच्या दिवशी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पाच जागा मागितल्या होत्या त्यापैकी आम्ही चार जागांवर समाधान मानलं व त्या ठिकाणी बंडखोरी झाली. या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाजपच्या बंडोखरीवर (Gulbrao Patil on Girish Mahajan) तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील धुसफूस अखेरच्या दिवसापर्यंत कायम असल्याचे दिसते.

गिरीश महाजनांना खोचक टोला

जळगाव शिवसेना शिंदे गट बंडखोर उमेदवार सहलीला रवाना झाले. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जळगावच्या शिवसेनेचा उमेदवार सहलीला गेला याबाबत मला माहिती नाही. माहिती घेऊन मी त्यांच्याशी बोलतो मी माझ्या कार्यक्रमात असल्यामुळे मला ह्या गोष्टीची माहिती नाही, असे पाटील म्हणाले. महायुती असताना देखील नाशिक येथील भाजपाच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला. आज तीन वाजेपर्यंत माघाराची मुदत आहे भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी आहे , ते काहीतरी तोडगा काढतील. कुणाच्या मनात काय आहे आपण हे कसं सांगणार? असा खोचक टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना लगावला.

मोठ्या भावानं लहान भावाची काळजी घ्यावी

स्थानिक पातळीवर त्यांना जे वाटतं आहे त्यांनी ते सांगितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी दूर केली आहे असे आमदार अब्दुल सत्तार यांच्या नाराजीवर गुलाबराव पाटील म्हणाले. आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज काय स्थिती राहिली असते. मोठ्या भावाने लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं, अशी सगळ्यांच्या अपेक्षा आहे. चार जागा आम्हाला मिळालेल्या आहेत आणि त्यातही जर बंडखोर उभे राहत असतील तर आमच्यावर अन्याय आहे, असा अन्याय होता कामा नये. मला वाटतं हे युती करता पुढच्या काळामध्ये चुकीचे आहे, असे मोठे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केले आहे.

भाजपकडूनच नेहमी कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये बंडखोरी

दोघांनी प्रामाणिकपणे काम केलं तरच चांगला रिझल्ट मिळणार आहे. जेमतेम चार जागा मिळाल्या आणि त्यावर देखील बंडखोर उभे राहत असतील. दोघांनी प्रामाणिकपणे काम केलं तरच महायुती चालेल… नाहीतर महायुती चालेल कसं कार्यकर्त्यांना समजवणार कसं असा सवाल करत कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल तर बंडखोरी टाळणं महत्त्वाचं आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले. विधानसभेमध्ये बंडखोरी करणार्‍यांवर कुठलीही कारवाई झाली नाही जळगावमध्ये तर उलट बंडखोरी करणार्‍यांना पद देण्यात आली. प्रभाकर गोटू सोनवणे यांना चार वेळा भाजप पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला, अशी नाराजी गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

दोन्ही शिवसेना एकत्र येणार?

जुने मित्र आहेत २५-२५ वर्षे झाले मित्र आहेत त्यामुळे त्यांनी (अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे )एकमेकांची भेट घेतली तर काय चुकीचा आहे. संजय राऊत यांनीच आम्हाला मातोश्रीवरून काढलं आणि आता तुम्हीच कशाला पुन्हा मातोश्रीवर बोलवत आहात, असा टोला ही गुलाबराव पाटील यांनी लगावला.

लग्न लागल्यावर तुम्ही बाजा लावणार याला काय अर्थ?

अन्याच्या विरुद्ध लढणारी शिवसेना आहे. जळगावची जागा शिवसेनेसाठी मागितली, मात्र मिळाली नाही. जळगावची जागा मला मिळाली नाही म्हणून आम्ही काही हा आमच्यावर अन्याय समजत नाही. नाशिकमध्ये आमच्यासमोर बंडखोर उभा राहिला आहे, हे मात्र कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर अन्याय आहे. सर्वांनी एकमेकांना आवरल पाहिजे. मंत्री गिरीश महाजन बोलले होते, जळगावची जागा तुम्ही घ्या नाशिकची जागा आम्हाला द्या, अशी आठवणही गुलाबराव पाटील यांनी करून दिली. यावर …लग्न लागल्यावर तुम्ही बाजा लावणार याला काय अर्थ आहे, नाराजीच्या सुरात मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us