Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस, प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट, रात्री दोन आमदारांशी अडीच तास चर्चा, तोडगा निघणार?
Manoj Jarange Hunger Strike: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत आता संपत आलेली आहे. तोडगा निघण्याऐवजी आरोपांची राळ उठली आहे. सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये विसंवादाचे वातावरण असताना आंतरवाली सराटीतून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अशोक काळकुटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये एकमत होऊन तोडगा निघेल असे वाटत असतानाच या आठवड्यात वारं फिरलं. जरांगे पाटील यांनी सरकारवर कुठलीच मागणी पूर्ण न करण्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे सरकारने त्यांच्या मागण्यांची पूर्तता केल्याची, 15 पैकी 12 मागण्या पूर्ण झाल्याचा दावा करत आहे. मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारी शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तर काल मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनीही जरांगे पाटील यांच्या भाषेवरून निशाणा साधला आहे. यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यातील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान मुंबईला धडक देण्याची भाषा पुन्हा जरांगे यांनी केली. त्याचवेळी काल आंतरवाली सराटीत मोठी घडामोड घडली.
जरांगे पाटील यांच्या प्रकृती कशी?
गेल्या 13 दिवसांपासून जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. डिहायड्रेशन झाले आहे मात्र आज सलाईन आणि पाणी घेतले असून प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती दिली. वैद्यकीय पथकाकडून जरांगे पाटलांची तपासणी करण्यात आली. पण त्यांनी अद्याप रुग्णालयात उपचार घेण्याविषयी भूमिका घेतली नाही.
सरकारकडून तोडगा काढण्यासाठी हालचाल
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस आहे. रात्री राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार राजेश विटेकर यांनी तब्बल अडीच तास चर्चा केली. तर काही मुद्दे लिहून घेतले. तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची महत्त्वाची माहिती पंडितांनी दिली. सरकारकडून काही हालचाली होतात का याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान 12 तारखेला अंतरवालीत राज्यव्यापी बैठक होणार असून मुंबईतील आंदोलनाची तारीख आणि स्वरूप जाहीर केले जाणार.
पाडळसिंगीत रास्ता रोको
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.बीडच्या गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रस्ता रोको करण्यात आला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, महिलांचा देखील रस्ता रोकोत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. मराठवाड्यातील अनेक भागात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रास्तारोको आणि टायर जाळून निषेध करण्यात येत आहे. तर कुणाला त्रास होईल असे न वागण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. पण ठोस तोडगा निघत नसल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.