Manoj Jarange: भगवं वादळ मुंबईत धडकणार, किती मराठे राजधानीत येणार? मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला, सरकारपुढे मोठे आव्हान
Manoj Jarange Hunger strike: मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच मुंबईत धडक देणार असल्याचा इशारा दिला आहे. सरकारने उगाच खुन्नस देऊ नये, मागण्या मान्य कराव्यात असे त्यांनी ठणकावले होते. आता राज्याच्या राजधानीत किती मराठे दाखल होणार याची माहितीच त्यांनी दिली आहे. यामुळे सरकारसमोर नवीन आव्हान उभे ठाकले आहे.

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मैदानात उतरले आहेत. अंतरवाली सराटीकडे मराठा बांधवांनी धाव घेतली आहे. मराठवाडा, गोदापट्टाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा समाज जालना जिल्ह्याकडे येत आहे. पण जरांगे पाटील यांनी त्यांचा पत्ता अगोदरच फेकला आहे. सरकारने जास्त खून्नस देऊ नये. मागण्या मान्य कराव्यात नाही तर मुंबईत आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. ‘वर्षा’ वर आंदोलन करण्याची इच्छाही त्यांनी यापूर्वीच बोलून दाखवली आहे. आता मुंबईत किती मराठे दाखल होतील याचा आकडाच त्यांनी सांगितला आहे. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईला 45 लाख वाहनातून मराठे मुंबईत
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशाही स्पष्ट केली. मुंबईला 45 लाख गाड्या येणार आहेत. आम्ही मुंबईला जाण्याची तयारी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणून बुजून करत आहेत आणि त्याला छुपा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांचा आहे असा आरोपही जरांगे यांनी केला. मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून ते करत आहेत, असे ते म्हणाले. आम्ही जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत हलणार नाही . चर्चा करायला कधी ही या ना काय अडचण आहे आम्ही मात्र हलणार नाही. यांना मराठ्यांच्या पोरांच चांगलं होवू द्यायचं नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
येत्या काही दिवसात तोडगा निघाला नाही तर अंतरवाली सराटी येथून मराठा बांधव मुंबईकडे कूच करतील असे जरांगे पाटील यांनी अगोदरच सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाची भाषा त्यांनी यापूर्वीच केली आहे. आता त्यांनी मुंबईत येण्याची किती तयारी झाली आहे, याची आकडेवारी समोर आणली आहे.
एक महिन्याचे साहित्य घेऊन आंदोलक अंतरवालीच्या दिशेने रवाना
बीडच्या पाटोदा तालुक्यातील मराठा बांधव एक महिन्याचे साहित्य घेऊन अंतरवालीच्या दिशेने रवाना झाले. पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातुन चार पिक अप घेऊन मराठा बांधव रवाना झाले आहेत. अंतरवाली नंतर मुंबई ला जाण्याची तयारी असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले. एक महिन्याचे राशन घेऊन निघालो आहोत, नोंदी असून प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
सिल्लोड तालुक्यात रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगर मध्ये रास्ता रोको आंदोलन केले. सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा फाटा येथे रास्ता रोको केला. छत्रपती संभाजीनगर – जळगाव महामार्गावर वाहने अडवली आहे. बेमुदत रास्ता रोकोचे बॅनर लावत समर्थकांनी यावेळी आंदोलन केले. यामुळे आंदोलनाचे लोण आता राज्यभर पसरत असल्याचे समोर आले आहे. राज्याच्या विविध भागातून मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे येत आहे. तर काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे.
