भाजपात जाण्यासाठी जयंत पाटील आग्रही होते…, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटानं राजकीय वर्तुळात खळबळ
जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा अनेकदा झाली, मात्र जयंत पाटील यांनी या सर्व गोष्टींचं खंडन केलं होतं. परंतु आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्याबद्दल नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा अनेकदा सुरू असते, मात्र जयंत पाटलांकडून या चर्चेचं नेहमीच खंडन केलं जातं. आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रही होते, त्यांनी त्यासाठी कोणा-कोणाचे उंबरे झिजवले याचे आपण साक्षीदार आहोत, असं संजयकाका पाटील यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड झाल्यानंतर संजयकाका पाटील आणि जयंत पाटील यांच्या चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे.
नेमकं काय म्हणाले संजयकाका पाटील?
संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजयकाका पाटील आहे, अशा शब्दात जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्राही होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे, जयंत पाटील यांचे राजकारण अडचणीत आणणार असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहासा काढायला भाग पडू नका, असा इशाराही यावेळी संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना दिला आहे.
दरम्यान सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटील यांनी संजयकाका पाटील यांच्यावर टीका करताना संजयकाका पाटील यांना आपणचं भाजपासोबत पाठवलं होतं, असं विधान केले होतं. जयंत पाटील यांच्या या विधानाचा देखील संजयकाका पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे. आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं, हे जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे, असं यावेळी संजयकाका पाटील यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडी झाल्यानंतर, संजयकाका पाटील आणि जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे, आता जयंत पाटील काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
