रुपाली चाकणकरांनी कोणा कोणाच्या भानगडी लपवल्या? करुणा मुंडेंनी मंत्र्यांची यादीच दिली
अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नाशिकचा भोंदू असलेल्या अशोक खरात याचं प्रकरण सध्या राज्यभरात चांगलंच गाजत आहे. त्याला न्यायालयानं पुन्हा एकदा 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मोठी मागणी केली आहे. खरात याच्या ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर या सदस्य होत्या, इतर कोणत्याही व्यक्तीला पद नाही, तर फक्त रुपाली चाकणकर यांना पद आहे. या प्रकरणात फक्त रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचीच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची सीबीआय आणि एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी यावेळी करुणा मुंडे यांनी केली आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, अशा भंगार लोकांना पाठबळ देणारे राजकारणी असतात. परंतु या गोष्टींची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. रुपाली चाकणकर यांनी जर काही केलं नसेल तर त्यांनी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे, असं करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. हा 100-200 कोटींचा मुद्दा नाहीये तर हजारो कोटींचा मुद्दा आहे, त्यामुळे पक्षाने चाकणकर यांचा राजीनामा घेतला पाहिजे असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान जी महिला रुपाली चाकणकर यांच्याकडे गेली होती, ती महिला माझ्याकडे पण आली होती. देव रुपाली चाकणकर यांना कधीही माफ करणार नाही. जेव्हा मी त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेले होते, तेव्हा जर त्यांनी माझ्या पतीला एक कॉल केला असता तर मी आज माझ्या पतीसोबत असते. रुपाली चाकणकर यांनी पदाचा गैरवापर केला आहे. गणेश नाईक, दीपा चव्हाण प्रकरणात न्याय भेटला नाही. दीपक सोळंके पाटील, प्रीती दीपक सोळंके प्रकरणात देखील न्याय झाला नाही. संजय राठोड पूजा चव्हाण, धनंजय मुंडे रेणू शर्मा, धनंजय मुंडे करुणा मुंडे, धनंजय मुंडे गणेश्वरी ताई मुंडे या प्रकरणात देखील न्याय भेटला नाही. राजाराम नाईक निंबाळकर प्रकरणात देखील न्याय भेटला नाही. मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गरजे आज बाहेर मोकळा फिरत आहे. संजय शिरसाठ यांचा मुलाच्या प्रकरणात महिलेनं पैसे घेऊन माघार घेतली. रामप्रसाद बोर्डीकर यांचा मुद्दा देखील रुपाली चाकणकर यांच्याकडेच होता. त्यातही काही झालं नाही. या दहा मंत्र्यांवर कारवाई न करण्याचे कारण मी चाकणकर यांना विचारते? असं यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे.
