Ketan Agarwal Murder Case : मी केतनला सगळं सांगितलं, तरीही त्याने… सिया गोयलची पोलिसांसमोर मोठी कबुली
Siya Goyal Confession : पोलिसांच्या चौकशीदरम्यान केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. तिच्या आणि चेतनमधील नात्याची, केतनला पूर्ण कल्पना होती. आपल्याला लग्न करायचं नव्हतं, असं आपण केतनला सांगितलही होतं असा दावा करत सियाने केतनच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांची माहितीही दिली.

Ketan Agarwal Case Pune : पुण्यातील चर्चित व्यावसायिक केतन अग्रवाच्या हत्याकांडात रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहे. सध्या सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी हे दोघे पोलीस कोठडीत असून चौकशी दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची गुपितं उलगडली. केतनची हत्या करण्याचा निर्णय हा अचानक घेण्यात आला नव्हता, तर त्यामागे अनेक दिवसांच सुनियजोति, काटेकोर प्लानिंग होतं, असं आता समोर आलंय. त्यातच सियाने असे काही खुलासे केलेच जे खरच खूप हैराण करणारे आहेत. सियाच्या सांगण्यानुसार, तिने केतनला सगळं काही सांगितलं होतं, आपल्याला हे लग्न करायचं नाही, असंही केतनला सांगितलं होतं, मात्र तो तयार नव्हता, असं सियाने चौकशीत कबूल केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सिया गोयलने कबूल केले की, केतनला कधी ढकलायचे याबद्दल तिने आणि चेतन चौधरीने आधीच एक ‘सिग्नल’ (संकेत) ठरवला होता. या योजनेनुसार, सियाने केतनसमोर वाकून तो संकेत द्यायचा होता, ज्यामुळे चेतनला, त्याला (केतन) दरीत ढकलणं शक्य होणार होतं. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर ही योजना अंमलात आणली गेली; चेतन त्या दोघांच्या जवळ येताच सिया खाली वाकली आणि चेतनने केतनला दरीत ढकलून दिलं.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण हत्येच्या कटामागे सिया हीच मुख्य सूत्रधार होती असं तपासातून निष्पन्न झालं आहे. तिनेच चेतनला हत्या करण्यास प्रवृत्त केले आणि त्याला लोहगडला नेण्याचा संपूर्ण कट रचला, असा दावा पोलिसांनी केला. यापूर्वी 14 जून रोजीही केतनला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता; त्यावेळी त्याला धक्का देण्यात आला असता, एका झाडाला पकडून त्याने आपला जीव वाचवला होता. नंतर, सापापासून वाचवण्यासाठी आपण त्याला धक्का दिला होता, असा दावा करून सियाने या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला होता.
31 मेला सिया केतनसोबत गेली होती डेथ पॉईंटवर
पोलिस तपासातून असं समोर आलं की, केतनचा काटा काढण्यासाठी सिया आणि चेतन यांनी तीन स्वतंत्र प्लान्स आखले होते. या प्रक्रियेची सुरुवात 31 मे रोजी झाली, तेव्हा सिया केतनसोबत पहिल्यांदाच लोहगड किल्ल्यावर गेली होती. तिथे एका दरीजवळील जागा कथितरीत्या ‘डेथ पॉईंट’ (मृत्यूचे ठिकाण) म्हणून निश्चित करण्यात आली होती. 14 जून रोजी झालेला पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, 18 जून रोजी दुसरी योजना अंमलात आणली गेली. त्यावेळीही केतन वाचला असता, तर त्याला मारण्यासाठी सियाकडे तिसरी योजनाही तयार होती. जर ती योजना सफल ठरली नसती तर सियाने केतनला रस्ते अपघातात मारण्याचा प्लान रचला होता.
मी त्याला चेतनबद्दल सांगितलं, लग्नासाठीही नकार दिला पण…
चौकशीदरम्यान सियाने असा दावा केला की, तिने केतनला, तिच्या आणि चेतनमधील प्रेमसंबंधांबद्दल सांगितलं होतं. मला हे लग्न करायचे नाहीये आणि पळून जायचे आहे, असे सियाने केतनला सांगितलं होतं; मात्र, केतन हे लग्न रद्द करण्यास तयार नव्हता. सियाच्या म्हणण्यानुसार, केतनने तिला सांगितलं की आता हे लग्न रद्द होऊ शकत नाही. आणि माझं कुटुंब इतके श्रीमंत आहे की तू कुठेही गेलीस तरी तुला शोधून काढू, असं केतन म्हणाल्याचा दाव सियाने केला.
चेतनसोबतच्या नात्याला कुटुंबाचा नकार
हे लग्न करण्यासाठी माझ्यावर कुटुंबाचा प्रचंड दबाव होता, असं सियाने पोलिसांना सांगितलं. केतनची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली आणि संपन्न आहे, तसेच त्याच्याशी लग्न केल्यास तिचं भविष्य सुरक्षित होईल, असे सियाच्या कुटुंबीयांना वाटत होतं. याउलट, चेतनची आर्थिक स्थिती फार चांगली नसल्याने ते त्याच्यासोबतच्या तिच्या नात्याच्या विरोधात होते.
तपासातून असेही समोर आले आहे की, सिया आणि चेतन या दोघांनाही अंमली पदार्थांचे किंवा नशिल्या गोष्टींचे व्यसन होते. पोलीस कोठडीत असताना दोघांनीही मद्यपान केल्याची कबुली दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाळा सोडली होती. चेतनचे काका नरेश यांनी सांगितले की, सियाच्या काही सवयींमुळे तिचे आई-वडील चिंतेत होते आणि लवकरात लवकर तिचे लग्न लावून तिचे आयुष्य स्थिरावण्याचा त्यांचा विचार होता.
तर लोहगड किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या धीरज जाधव या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना सांगितले की, हत्येच्या दिवशी चेतन चौधरी हा अंग झाकणारे पूर्ण कपडे आणि मास्क घालून किल्ल्यावर आला होता. तिकीट मागितल्यावर त्याने आपण व्यायामासाठी आलो असल्याचे सांगून 25 रुपयांचे प्रवेश शुल्क नंतर भरतो असं सांगितलं होतं. तर सियानेही तिकिटाबाबत वाद घातला आणि नंतर आपण ऑनलाइन पैसे भरू असं सांगितलं होतं.
