हा डीसीपी कुठल्या मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो? लै भयानक काळ आलाय गड्याहो… किरण माने यांची सूचक पोस्ट चर्चेत
माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूची एफआयआर नोंदवण्यासाठी रोहित पवार मुंबई, बारामती आणि सीआयडीकडे प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा एफआयआर नाकारण्यात आला. एका बड्या राजकीय नेत्याच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्याने सामान्य जनतेच्या हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरण माने यांनीही या पोलीस कारवाईवर सूचक पोस्ट करून व्यवस्थेवर प्रकाश टाकला आहे.

Kiran Mane : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा एफआयआर दाखल करावा म्हणून त्यांचे पुतणे रोहित पवार प्रयत्न करत आहेत. रोहित पवार गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि बारामतीच्या पोलीस ठाण्यात एफआयआरसाठी ठाण मांडून होते. पण त्यांचा एफआयआर घेतला नाही. त्यानंतर त्यांनी पुण्यात सीआयडीचं कार्यालय गाठलं. पण तिथेही त्यांना दाद मिळाली नाही. देशातील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच कुटुंबातील व्यक्तीचा साधा एफआयआर नोंदवून घेतला जात नसल्याने देशात खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नाही तर सामान्यांचं काय? असा सवाल या निमित्ताने केला जात असून पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अभिनेते किरण माने यांनीही फेसबुकला एक पोस्ट शेअर करून या प्रकरणावर सूचक भाष्य केलं आहे. किरण माने यांच्या या पोस्टची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
काय आहे पोस्ट?
किरण माने यांनी अत्यंत मोजक्या शब्दात पण नेमकी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राजकीय कुटुंबातील व्यक्तीची होणारी ससेहोलपट आणि पोलिसी कारभारावर सूचक भाष्य केलं आहे. त्यामुळेच माने यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पोस्ट जशीच्या तशी…
एक डीसीपी म्हणतो, “एफआयआर घेत नाही. काय करायचे ते करा.”
कुणाला म्हणतो? …महाराष्ट्रातल्या सगळ्यात वजनदार कुटुंबातल्या आमदाराला !
बरं, ती एफआयआर कशासाठी करायचीय? …या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासाठी !
हे उपमुख्यमंत्री कुणाचे पुतणे? तर या देशाचा पंतप्रधान ज्यांना गुरुस्थानी मानतो, त्यांचे.
…आणि अशा व्हीव्हीआयपी व्यक्तीला एक डीसीपी म्हणतो, “एफआयआर घेत नाही. काय करायचे ते करा.”
यांची ही हालत… सामान्य माणसाचं कुत्रं तरी हाल खाईल का???
…आणि आता विशेष महत्वाचा प्रश्न : हा डीसीपी कुठल्या मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो?
आपल्याच धडावर आपलं डोकं ठेवून विचार करा.
लै भयानक काळ आलाय गड्याहो…
जागे व्हा !
असं किरण माने यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. माने यांची पोस्ट धडाधड रिट्विट होत आहे. त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे. तसेच राज्यकारभारावर जोरदार टीका होत आहे. एफआयआर नोंदवला तर बिघडलं कुठे? हा जर अपघातच असेल तर एफआयआर का घेत नाही? कर नाही त्याला डर कशाला? अशा प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहेत.
रोहित पवारांचे प्रयत्न
रोहित पवार यांनी आधी मरीन ड्राईव्ह येथे जाऊन एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा एफआयआर घेतला नाही. रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे सहकारीही होती. पोलिसांशी चर्चा झाल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने नंतर एफआयआर टाईप करायलाही घेतला. पण हा एफआयआर टाईप होत असतानाच डीसीपी आला आणि त्याने एफआयआर होणार नाही म्हणून सांगितलं. त्यामुळे एफआयआर नोंदवला गेला नाही. त्यानंतर रोहित पवार हे बारामतीला गेले. बारामतीत पोलीस ठाण्यातही त्यांनी एफआयआर नोंदवून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही दोन तास थांबूनही एफआयआर नोंदवून घेतला नाही. हालाकी असंख्य वकीलही पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनीही पोलिसांना कायदा सांगूनही त्याची दखल घेतली नाही, असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी सीआयडीकडे जाऊन एफआयआर नोंदवण्याची विनंती केली. तिथेही त्यांचा एफआयआर नोंदवून घेतला नाही.
