राज्यपालाच्या निवासस्थानी गोळीबाराचा थरार, SRPF जवानाने गोळी झाडून आयुष्य संपवलं

राजभवनात ड्युटीवर असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जवानाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

राज्यपालाच्या निवासस्थानी गोळीबाराचा थरार, SRPF जवानाने गोळी झाडून आयुष्य संपवलं
| Updated on: Jul 07, 2026 | 8:05 AM

मुंबईच्या मलबार हिल परिसरात असलेल्या अतिसुरक्षित राजभवनातून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राज्यपालांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानाने आयुष्य संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लोकभवनातील एसआरपीएफ कँम्पमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  राजभवनात ड्युटीवर असलेल्या जवानाने स्वत:च्या सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं. जवानाच्या आत्महत्येचे अधिकृत कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कौस्तुभ सांगळे असे आत्महत्या केलेल्या एसआरपीएफ जवानाचं नाव आहे. ते पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. नाशिकचे रहिवासी असलेले कौस्तुभ सांगळे हे कोल्हापूरच्या एसआरपीएफ ग्रुप 16 तुकडीमध्ये कार्यरत होते. सध्या त्यांची राज्यपालाच्या निवासस्थानी लोकभवनाच्या सुरक्षेसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

गार्ड ड्युटीवर होते तैनात 

ते राजभवन परिसरात असलेल्या ‘लोक भवन’ येथे गार्ड ड्युटीवर होते. त्यांनी ड्युटीवर असताना अचानक स्वत:च्या रायफलमधील गोळी स्वत:वर झाडली. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्यानंतर सर्वांची एकच धावाधाव झाली. तोपर्यंत कौस्तुभ यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने राजभवन परिसरात सर्वत्र तणावाचं वातावरण निर्माण झालं.

SRPF जवानाने आत्महत्या का केली? 

SRPF जवानाच्या आत्महत्येची माहिती मिळताच मलबार हिल पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर कौस्तुभ सांगळेंचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवला. कौस्तुभ यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्यांच्याजवळ कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. या प्रकरणी पोलीस राजभवनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास मलबार हिल पोलीस करत आहेत. राजभवनासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी एसआरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिक घेतात, हे पाहावे लागेल.

Follow Us