Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का; सरकारचा मोठा निर्णय, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी
लाडकी बहीण योजना राज्यातील महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. मात्र आता या योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला असून, त्यामुळे लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढणार आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यातील ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी दिला जातो. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेचा मोठा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाल्याचं पहायला मिळालं. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती, तेव्हा या योजनेसाठी काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या. मात्र अनेक महिला या योजनेसाठी पात्र नसताना देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं सरकारच्या निर्दशनास आलं. त्यानंतर या योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
या योजनेचा लाभ हा खऱ्या महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशानं सरकारने या योजनेसाठी केवायसी बंधनकारक केली होती. दरम्यान केवायसीला दोनदा मुदतवाढ देखील देण्यात आली होती. 31 डिसेंबर 2025 पर्यंत या योजेनेसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत होती. मात्र त्यानंतर देखील अनेक महिलांनी आपली केवायसी न केल्यामुळे त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. तसेच काही महिलांनी या योजनेसाठी केवायसी केली परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं त्यांना देखील पैसे मिळत नव्हते आता अशा महिलांना चूक दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ‘साम’ने दिलेल्या माहितीनुसार या योजनेतून आता तब्बल 90 लाख लाडक्या बहिणींचं नाव वगळण्यात आलं आहे. पूर्वी या योजनेतील महिलांची संख्या ही 2.26 कोटी होती, तीच आता महिला लाभार्थ्यांची संख्या 1.53 कोटींवर आली आहे. म्हणजेच जवळपास 90 लाख महिला या योजेनेसाठी अपात्र ठरल्या आहेत.
नेमकं कारण काय?
याच सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने या योजनेसाठी ज्या अटी घातल्या होत्या, त्या अटींमध्ये न बसणाऱ्या महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली आहे. तसेच ज्यांनी केवायसी पूर्ण केली नाही अशा महिलांची नावं देखील वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
