Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी; आता त्या महिलांनाही मिळणार पैसे, आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आता या योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात. परंतु अनेक महिलांनी ई केवायसी केली, त्या या योजनेसाठी पात्र देखील आहेत, मात्र त्यांचा हाफ्ता बंद झाला होता. आता अशा महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सरकारने अशा अर्जांचं आता पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन सुरू केलं आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?
‘साधारणपणे 2025 च्या ऑगस्टमध्ये आपण ई केवायसीची प्रक्रिया सुरू केली होती, आणि या केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्यांची मुदतवाढ देखील देण्यात आली. पहिल्या टप्प्यात एक महिना, त्यानंतर पुन्हा दोन महिने, त्यानंतर आणखी दोन महिने आणि शेवटी डिसेंबर 31 पर्यंत आपण केवायसीला मुदतवाढ दिली. त्यानंतर सुद्धा ज्यांनी डिसेंबर 31 पर्यंत ई केवायसी केली होती, परंतु त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या, त्यांना देखील या सर्व चुका सुधारण्यासाठी एप्रिल 2026 पर्यंत संधी देण्यात आली होती. ज्या महिला या योजनेतून वगळ्यात आल्या आहेत, त्या महिलांपैकी ज्यांनी केवायसी केली नाही, अशाच महिलांची संख्या 60 लाखांपेक्षा अधिक आहे. तर काही महिलांचं आर्थिक उत्पन्न हे जास्त असल्यामुळे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. अशा महिलांची संख्या ही तेरा, चौदा लाखांच्या घरात आहे.
कुठलीही पात्र महिला ज्यांनी ईकेवायसीची प्रक्रिया केलेली आहे, परंतु तरी सुद्धा अशा महिलांना लाभ मिळत नाही, अशा प्रकारे पात्र असलेल्या कुठल्याही महिलांवर अन्याय होणार नाही. त्यासंदर्भातील काही तक्रारी आणि निवेदन आम्हाला प्राप्त झाली आहेत. ज्यांनी ईकेवायसीची प्रक्रिया केली होती. परंतु तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये, असे अर्ज आता पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करण्याचं काम सुरू आहे. तसेच ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनेचे अर्ज भरले होते, परंतु त्यांना एकाही योजनेचा लाभ मिळत नाही, अशा महिलांना किमान एका तरी योजनेचा लाभ मिळावा असा आमचा प्रयत्न असल्याचं यावेळी आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. ‘
