महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा साठा किती? छगन भुजबळांनी दिली मोठी अपडेट
महाराष्ट्रात इंधनटंचाईच्या अफवा असल्या तरी, मंत्री छगन भुजबळ यांनी पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. अनावश्यक खरेदीमुळे मे महिन्यात इंधन विक्री 20 % वाढली. नागरिकांनी घाबरून साठा करू नये; सरकार इंधन पुरवण्यास सक्षम आहे. संयम राखून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन भुजबळांनी केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर देशात तसेच महाराष्ट्रात राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून लोकंही चिंतेत आहे. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
” राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये”, असं माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले. ” गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाली ” अशी माहिती त्यांनी दिली.
अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही
“देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही,” असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.
यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पेट्रोल डिझेल बाबत प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शेतीसाठी डिझेलचा वापर होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना डिझेल देण्याचे आदेशच दिले असून तसं प्लानिंग करायला जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे, असं सांगतानाच कुणीही पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करू नका. आवश्यकतेनुसार डिझेल देण्याचे नियोजन केले गेले आहे. सर्वदूर तणावाची परिस्थिती नाही. एखादी घटना घडते ती हायलाईट होते. आपण 660 बिलियन डॉलर्समध्ये आहोत. सिंगापूर आणि दुबईच्या अर्थव्यवस्थेला आपण काही वर्षात मागे टाकू शकतो, अशी स्थिती आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
