Maharashtra ZP Election Results 2026 : अजितदादांचा राष्ट्रवादी कितव्या स्थानावर? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कल काय सांगतो ?

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाने एकूण निकालात तिसरे स्थान पटकावले असले तरी, बारामतीमध्ये त्यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपने सर्वाधिक जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आघाडी घेतली असून, महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे.

Maharashtra ZP Election Results 2026 : अजितदादांचा राष्ट्रवादी कितव्या स्थानावर? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कल काय सांगतो ?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची स्थिती काय ?
| Edited By: | Updated on: Feb 09, 2026 | 1:42 PM

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. सुरुवातीचे कल हाती आले आहेत. जिल्हा परिषदेच्या 12 पैकी 12 जिल्हा परिषदांचे कल हाती आले आहेत. तर पंचायत समितीच्या 125 पैकी 106 जिल्हा परिषदांचे कलही हाती आले आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांनी या निवडणुकीचा प्रचार केला होता. त्यांच्या निधनानंतर या निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. त्यामुळे अजितदादांचा पक्ष कितव्या स्थानी आहे, याचं कुतुहूल सर्वांनाच लागलं आहे. बारामतीचा निकाल काय लागला? याकडेही राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

अजितदादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीसह राज्यातील सत्तेतील आणि विरोधी पक्षानेही निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचं वर्चस्व होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व निर्माण झालं आहे. भाजपने 12 पैकी 7 जिल्हा परिषदांमध्ये आघाडी घेतली आहे. तर 106 पैकी 40 पंचायत समित्यांमध्ये आघाडी घेतली आहे. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीने 12 जिल्हा परिषदांपैकी एका आणि 125 पंचायत समित्यांपैकी 20 पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व निर्माण केलं आहे. जिल्हा परिषदेत अजितदादांचा पक्ष तिसऱ्या तर पंचात समितीतही अजितदादांचा पक्ष तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.

बारामतीत वर्चस्व

बारामती पंचायत समितीच्या 12 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. यातील एका जागेवर अजितदादा गटाच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलं आहे. तर भाजपने केवळ दोन जागांवर आघाडी घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना जिल्हा परिषदेत तीन जागांवर आघाडी घेऊन दुसऱ्या तर पंचायत समितीत 24 जागांवर आघाडी घेऊन दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेसची सुमार कामगिरी

या निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. ठाकरे गटाला जिल्हा परिषदेत खातंही खोलता आलं नाही. तर पंचायत समितीच्या निवडणुकीत फक्त पाच जागांवर ठाकरे गट आघाडीवर आहे. ठाकरेंच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी थोडी बरी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने एका जागेवर तर पंचायत समितीत 8 जागांवर आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत महायुतीचं वर्चस्व राहिलं असून महाविकास आघाडीचं पुरतं पानीपत झालेलं पाहायला मिळत आहे.