Maharashtra News LIVE : सुरत नागपूर महामार्गावर तिहेरी अपघात, नऊ जणांचा मृत्यू
Maharashtra News LIVE : विधान परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून 2026 होती. त्यानंतर आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर अर्ज माघार घेण्याची मुदत 4 जून 2026 पर्यंत आहे.

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. महायुतीत भाजपने ११ जागा स्वत:साठी ठेवल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला चार तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा सोडल्या आहेत. यावेळी भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीने गेल्या वेळी जिंकलेल्या छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जागा स्वत:कडे घेतल्या आहेत. याशिवाय गेल्या वेळी काँग्रेसने जिंकलेला सातारा- सांगली, नांदेड या मतदारसंघांतही उमेदवार उभे केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शेवटपर्यंत आग्रही होते. पण भाजपने ही जागा सोडण्यास ठाम नकार दिला. तर दुसरीकडे कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. त्याविरोधात आज आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
वाढत्या महागाईविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, गिरगावात आंदोलन
मुंबई : वाढत्या महागाईविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. आज गिरगावात शिवसेनेने आंदोलनाची हाक दिली होती. खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत आंदोलन हे आंदोलन आयोजित करण्यात आले. सायकल चालवत आणि चूल मांडून सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाणार आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होणारी वाढ आणि पर्यायाने उडालेला महागाईचा भडका यासगळ्याचा ठाकरे सेनेकडून निषेध केला जाणार आहे.
-
सुरत नागपूर महामार्गावर तिहेरी अपघात, नऊ जणांचा मृत्यू
नंदूरबार – सुरत नागपूर महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात 9 लोकांच्या मृत्यू झाला आहे. गुजरात राज्यातील व्याराच्या उवा गावाचा परिसरात पाण्याचे टँकरला वाचवण्याच्या प्रयत्नात हा तिहेरी अपघात झाला आहे महाराष्ट्राच्या दोन बस समोरासमोर धडकल्यानंतर एक ट्रॅक्टरनेही अपघात झालेल्या बसला धडक दिली आहे. त्यात एकूण सात जाणांचा मृत्यू झाला आहे.
-
-
कर्जमाफी नको, हमीभाव द्या, शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्य सरकारने कर्जमाफीला मंजुरी दिल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव उद्या, हमीभाव दिल्यानंतर आम्हाला कर्जमाफीची गरज नाही, असंही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
-
अमरावती : तपोवन जंगल परिसरात युवतीचा मृतदेह आढळला
अमरावती शहरातील तपोवन जंगल परिसरात युवतीचा जळालेला मृतदेह आढळला आहे. हत्या करून मृतदेह जाळल्याचा प्राथमिक संशय आहे. मृत युवतीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलन करण्याचेही काम सुरू आहे.
-
पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळवंडी जवळ भीषण अपघात
पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळवंडी बस स्थानक चौकात मंगळवारी दुपारी एक भीषण अपघाताची घटना घडली. महामार्गावरून अचानक वळण घेणाऱ्या एका कारला पाठीमागून येणाऱ्या भरधाव गाडीने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला फेकली गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही.
-
कल्याण पूर्वेत महिलांकडून तेलाच्या डब्यांची चोरी
कल्याण पूर्वेत पत्रिपुल परिसरात असलेल्या हनुमान सुपर मार्ट या दुकानात 2 महिलांनी तेलाच्या डब्यांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे .दुकानात काम करणाऱ्या कामगरांसह दुकान चालकाला बोलण्यात गुंतवून तेलाचे डबे चोरून नेताना या महिला दुकानातील CCTV कॅमेरात कैद झाल्या आहेत . याप्रकरणी दुकानदाराने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
-
जालना : कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट
जालन्यातून एक बातमी समोर येत आहे. कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट रचून एका निष्पाप तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीन गवळी याने स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचून संदीप चव्हाण या तरुणाची गळा दाबून हत्या केली. अपघाताचा देखावा निर्माण करण्यासाठी संदीप चव्हाण यांचा मृतदेह कारमध्ये ठेवून ती कार पेटवून दिल्याच तपासात समोर आलं आहे.
-
महागाईविरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर, भायखळा रेल्वे स्टेशनजवळ आंदोलनाला सुरुवात
महागाईविरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. भायखळा रेल्वे स्टेशनजवळ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. जनतेच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे केंद्र-राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन महागाईविरोधी एल्गार पुकारण्यात आला आहे. आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.
-
कांदिवलीत काँग्रेसकडून इंधन-गॅस दरवाढीविरोधात आंदोलन
मुंबईत काँग्रेस इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरली आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे. या जनविरोधी धोरणाविरोधात मुंबई काँग्रेस कांदिवलीत भव्य आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे.
-
बीड रंजेगाव महिला मारहाण प्रकरण, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा
बीड तालुक्यातील रंजेगाव येथील महिलेला मारहाण झाल्या प्रकरणात 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील रंजेगाव इथं 2 दिवसांपूर्वी महिला घरी एकटी होती. तेव्हाघरासमोर लघुशंका करत दगड मारून महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. महिलेच्या शरीरावर सर्वत्र मारहाणीचे व्रण दिसत आहेत. महिलेवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपळनेर पोलीस ठाण्यात 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
-
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे राज्यपाल जिष्णु देव वर्मांकडून स्वागत
राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मां यांनी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं. राज्यपालांनी यू मीन आँग ह्लाइंग यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं.
-
राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी- नितीन राऊत
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय स्थिती असल्याची टीका नितीन राऊत यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
-
तामिळनाडूमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी 18 जून रोजी निवडणुका होणार
ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) चे नेते सी. व्ही. षण्मुगम यांच्या राजीनाम्यानंतर, तामिळनाडूमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी 18 जून रोजी निवडणुका होणार आहेत.
-
सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयात पाच नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी पाच नवनियुक्त न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. केंद्र सरकारने यापूर्वी चार उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची आणि एका ज्येष्ठ वकिलाची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती.
-
मदर डेअरीने मातीत विरघळणारे पाऊच केले सादर
मदर डेअरीने मंगळवारी पर्यावरण आणि शाश्वततेप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा भाग म्हणून, मातीत विरघळणारी नवीन दुधाची पिशवी सादर करून एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. मदर डेअरीने सांगितलं की, “भारतातील पहिली मातीत विरघळणारी दुधाची पिशवी सादर केली आहे, जी पर्यावरणात प्लास्टिकचा कोणताही मागमूस सोडत नाही.”
-
शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! महाराष्ट्रात मान्सून 10 जूनपर्यंत येण्याची शक्यता
मान्सून अंदमानातून पुढे सरकला असून केरळमध्ये 4 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे. येत्या दोन तीन दिवसात मान्सूसला अरबी समुद्राता पोषक वातावरण आहे. तर राज्यात 10 जूनपर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे. यंदा सरासरीपेक्षा 90 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
#WATCH | Thiruvananthapuram, Keralam: On the arrival of monsoon in Keralam, IMD Scientist, Neetha K Gopal says, “The conditions for the onset of monsoon are getting ready, so we can declare it on 4th June. We will witness a good amount of rainfall from this evening. In the coming… pic.twitter.com/6y4uIwkrHe
— ANI (@ANI) June 2, 2026
-
इंधन दरवाढीविरोधात येवला काँग्रेसचे आंदोलन
इंधन दरवाढ तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ येवला काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील विंचूर चौफुली येथे आंदोलन केले . यावेळी कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर मेलेडी चॉकलेट वाटप करत सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान विस्कळीत झाले असून इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणाव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.
-
जळगाव : शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा; कृषी अधिकाऱ्यांकडे रयत सेनेचे निवेदन
खरीप हंगामाची लगबग सुरू असताना चाळीसगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर खतांचा प्रश्न गंभीर बनला आहे. युरिया खत खरेदीसाठी कृषी केंद्रांवर जाणाऱ्या शेतकऱ्यांना इतर रासायनिक खते खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप रयत सेनेने केला आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
-
जेजुरी पोलिसांचा व्यापाऱ्यांना इशारा
अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत येणाऱ्या भाविकांना आता भंडारा आमच्याकडूनच घ्या अशी सक्ती करता येणार नाही जर कोणी व्यापाराने भंडारा आमच्याकडूनच घ्या अशी सक्ती केली तर तो खंडणीचा प्रकार समजला जाईल असा इशारा जेजुरी पोलिसांनी दिलाय.
-
मुंबईला पाणीपुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव आटला
मुंबईला पाणीपुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव आटला. 40 दिवस पाणीपुरवठा होईल एवढाच पाणीसाठा शिल्लक. तलावातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 15.57 टक्के पाणीसाठा शिल्लक
-
पालघरच्या बोईसरमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात हाणामारी
पालघरच्या बोईसरमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात हाणामारी. बोईसरच्या दांडी पाडा परिसरात जमिनीच्या वादातून राडा. हाणामारीत महिलांनाही मारहाण झाल्याचा प्रकार. या राड्यात 3 ते 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती. बोईसर पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात गुन्हा दाखल
-
परभणीच्या मानवतमध्ये गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा
परभणीच्या मानवतमध्ये गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा. सकाळपासून गॅस भरण्यासाठी नागरिकांच्या एजन्सीबाहेर रांगा. घरगुती गॅस भरण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ. बुकिंग केल्यानंतरही 15 दिवस गॅस मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप
-
संजय नगर गोविंदपूर भागातील तीन गोदामाला भीषण आग
गोंदिया येथील संजय नगर गोविंदपुर भागातील जवळजवळ असलेल्या तीन गोदामाला सकाळच्या सुमारास लागली भीषण आग लागली. यात गुडाखू फॅक्टरी, मित्तल ट्रेडर्स, आशीर्वाद प्लास्टिक , श्री चंदन ट्रेडर्स यांच्या बारदाना गोडाऊनला लागली भीषण आग.. जवळपास एक किलोमीटर पासून दिसतोय आगीचा धूर दिसत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीत संपूर्ण गोदामातील जवळपास सर्वच सामान जळून खाक झाले. अग्निशमन विभागाचे आग विझवण्याकरता शर्यतीचे प्रयत्न सुरू असून जवळपास 50 टक्के आग काबुत करण्यात आली आहे. आगीमुळे कुठलीही जीवित हानी झाली नसून अद्याप मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.
-
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर गंभीर आक्षेप
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जात नमूद असलेल्या सुचकाची सही बोगस असल्याचा आक्षेप घेण्यात आला. पंढरपूरचे नगरसेवक आणि सूचक म्हणून नाव असलेल्या नागेश भोसले यांनी आक्षेप घेतला .या गंभीर आक्षेपामुळे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी आज वैध होणार की अवैध याकडे लक्ष लागले आहे.
-
शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
नांदेडच्या मुदखेड तहसीलवर आज काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले असून खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे. मुदखेड शहरातील ठाकरे चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चात गाढवाच्या पाठीवर सरकार आमच्या सारखं वागू नका असे बॅनर लावण्यात आले आहेत. खत बियाण्यांची मोठ्या प्रमाणात दर वाढ झालीय, महागाईंचा आगडोंब उसळलाय. मशागतीसाठी लागणारा डिझेलचा काळाबाजार होऊ लागलाय. अनेक मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळाला नाहीये. खतांचा व्यापारी कृत्रिम तुकडा निर्माण करीत आहेत या सह विविध मागण्यांसाठी आज काँग्रेस आक्रमण झाले होते. सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीत गाढवपणा करू नये अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
-
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत सूचक आणि अनुमोदकाच्या बोगस सह्या
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत सूचक आणि अनुमोदकाच्या बोगस सह्या केल्याची माहिती समोर येत आहे. न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार अशोक वाघमोडे यांनी बोगस सह्या केल्याची माहिती समोर येत आहे. आरती वाकसे, दिपाली वाघमोडे, जयश्री एकतपुरे, मनीषा मेटकरी, प्रतीक्षा मेटकरी, केरप्पा पांढरे, सिंधूताई आलदार, गणेश बनकर, शोभा फुले, विजय इंगोले या नगरसेवकाच्या बोगस सह्या केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. बोगस सह्या विरोधात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस कार्तिकेयन यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
-
दानवे-सत्तार यांची गळाभेट, कुणाला काय संदेश?
समृद्धी महामार्गावर ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि शिंदे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांच्यात गळाभेट झाली. दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे कालच दोघांनीही वक्तव्य केलं होतं. आज सत्तार मुंबईला तर दानवे शिर्डीला जाताना समृद्धी महामार्गावर भेट झाली.
-
शेतकरी कर्जमाफी योजनेविषयी मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
शेतकरी कर्जमाफी योजनेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कर्जमाफी योजनेचा निर्णय झाला आहे. त्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. पण निवडणूक आयोगाने त्याची घोषणा न करण्याची अट घातल्याने निवडणूक संपल्यानंतर याविषयीची घोषणा करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
-
भाजप नेते अनुपस्थितीबाबत रवींद्र फाटक यांची मोठी प्रतिक्रिया
शिवसेना भाजप युती म्हणून मला उमेदवारी देण्यात आलेले आहे अर्ज भरताना भाजप शिवसेना पक्षाच्या वतीने अनेक मान्यवर उपस्थित होते. कोवीड काळामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकला नाही. महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामाला लागले आहे. 99 टक्के मतदान महायुतीला मिळेल. उमेदवारी अर्ज भरताना भाजप पक्षाचे आमदार अनुपस्थित असले तरी माझे बोलणे रवींद्र चव्हाण,गणेश नाईक, नरेंद्र मेहता, संजय केळकर, मंदा मात्रे ,या सर्व भाजप आमदारांशी माझं बोलणं झालेलं आहे. या सर्व आमदारांनी मला आशीर्वाद दिला आहे कामानिमित्ताने ते येऊ शकलो नाही प्रचारा दरम्यान मी त्यांची भेटीसाठी घेणार अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी दिली.
-
जळगावात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने वडापाव , पोहे, रस्सावडा, समोशाचे दर वाढले
जळगावात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने वडापाव , पोहे, रस्सावडा, समोसा याच्या दरात प्रत्येकी पाच रुपयांनी वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने जळगावमध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर परिणाम झाला आहे.
जळगावमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 45 ते 50 रुपयांपर्यंत वाढ झाल्याने नाश्ता सेंटर चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे साहजिकच विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ याचे दर देखील प्रत्येकी पाच रुपयांनी वाढवले आहेत. सिलेंडर बरोबरच तेल तसेच इतर वस्तू देखील महागल्याने व्यवसाय करणं परवडत नसल्याचं विक्रेत्याने म्हटलंय.
-
मंचर – 10 जून पर्यंत लोकं मरायचा मुहूर्त बघताय का – आंदोलनादरम्यान रोहित पवार भडकले
कांदा उत्पादकांसाठी मविआचा मोर्चा असून आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रोहित पवारांनी पुणे-नाशिक महामार्गावर कांदे फेकले.
-
रावेर तालुक्यात पुन्हा गारपीट चक्रीवादळ पावसाचा तडाखा
रावेर तालुक्यात पुन्हा गारपीट चक्रीवादळ पावसाचा तडाखा. अहिरवाडी परिसर व अनेक ठिकाणी केळीपीक जमीनदोस्त झालं. आधीच शेतकरी संकटात असताना पुन्हा नैसर्गिक संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तातडीने सरसकट पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
-
गळ्यात कांद्याची माळ घालून मविआच्या नेत्यांचं आंदोलन
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मविआने विराट मोर्चा काढला आहे. गळ्यात कांद्याची माळ घालून मविआ नेत्यांचं आंदोलन सुरू आहे.
-
कांदा उत्पादकांसाठी मविआचा मंचर येथे विराट मोर्चा
मंचर/पुणे – कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचविण्यासाठी मंचर येथे विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पुणे नाशिक महामार्गा रोखण्यासाठी आंदोलक आणि नेते रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रोहित पवार, शशिकांत शिंदे ,निलेश लंके , बापू पठारे रस्ता रोको मध्ये सहभागी झालेत
-
खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये, नगरसेवकांशी साधणार संवाद
खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये असून त्या काँग्रेस नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची काँग्रेस भवनात बैठक आहे. पुणे विधान परिषदेची जागा महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांशी सुप्रिया सुळे संवाद साधणार आहेत.
-
जळगाव जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा
जळगाव जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा. पारोळा तालुक्यातील चोरवड परिसरात मोठं नुकसान झालं. चोरवड गावात अनेक ठिकाणी शेडनेट, गोठे, पोल्ट्री फॉर्म उद्ध्वस्त झालेत. खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात येत आहे.
-
कांद्याला भाव मिळत नसल्याने मंचरमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरसह भव्य महामोर्चा
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा या मुख्य मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य सर्वपक्षीय महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हक्काचा दर मिळत नसल्याने संतप्त झालेले शेतकरी आपल्या ट्रॅक्टरमध्ये कांद्याच्या पिशव्या भरून थेट आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. घाम गाळून पिकवलेल्या पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने, सरकारचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी हे अनोखे आणि आक्रमक पाऊल उचलले असून या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
नाशिक TCS तरुणी अत्याचार प्रकरण: घरमालक हनीफ खान आता सहआरोपी, सखोल चौकशी सुरू
नाशिक येथील टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा लैंगिक छळ आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान राहत असलेल्या घराचा मालक हनीफ खान युसुफ खान याला आता गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. निदा खान हिला घराची चावी कोणी दिली आणि भाडे व्यवहार कोणी केला, याचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत आहे. याशिवाय, संशयित मतीन पटेल आणि हनीफ खान यांच्यातील संबंधांचाही शोध घेतला जात आहे. ४० दिवस फरार असताना निदाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय घेतल्याचा संशय असून, एसआयटीने हनीफ खानच्या घराचा स्पॉट पंचनामा व कागदपत्रांची तपासणी पूर्ण केली आहे. हनीफ खानचे नाव आता पुरवणी दोषारोपपत्रात नमूद करण्यात येणार असल्याने त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
-
कर्जतमध्ये होर्डिंग कोसळून तरुणाचा मृत्यू; वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना
कर्जत तालुक्यातील राशीन येथे वादळी वाऱ्यामुळे एक अनधिकृत होर्डिंग अचानक कोसळून २४ वर्षीय अमित मोहन सुकाळ या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हवेच्या दाबामुळे होर्डिंग फाटू नये म्हणून बॅनरला छिद्रे पाडण्यासाठी अमित या होर्डिंगवर चढला होता. मात्र, त्याच वेळी आलेल्या वादळी वाऱ्याच्या तीव्र झोक्यामुळे संपूर्ण होर्डिंगच जमिनीवर कोसळले. या भीषण दुर्घटनेप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत विकास लहू सायकर याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
-
बदलापुरात उड्डाणपुलावर वाहतूक ठप्प; दोन वाहनांमध्ये बिघाड झाल्याने वाहनांच्या रांगा
बदलापूर शहरातील मुख्य उड्डाणपुलावर आज एकाच वेळी दोन वेगवेगळ्या वाहनांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. उड्डाणपुलाच्या मध्यभागीच ही दोन्ही वाहने बंद पडल्यामुळे मागून येणाऱ्या वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला आणि काही वेळातच पुलावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने नोकरदार आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिघडलेली वाहने बाजूला सारण्याचे आणि वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
-
लाडकी बहीण योजनेतून महिलांची मतं विकत घेतली, संजय राऊतांचा घणाघात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांची मतं विकत घेण्याचा प्रकार सरकारने केला आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा दावा करत ते म्हणाले की, राज्यातील तब्बल ८० लाख अपात्र महिलांना सरकारी तिजोरीतून पैसे देण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व अपात्र महिलांवर सरकारी तिजोरीच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. या विधानामुळे लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
-
बीड बायपास उड्डाणपुलाच्या कामाला विलंब; पावसाळ्यात अपघात वाढण्याची भीती
धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड शहरालगतच्या बायपासवर अनेक भीषण अपघातांमध्ये प्रवाशांचे बळी गेल्यानंतर अखेर प्रशासनाने उड्डाणपुलाचे काम सुरू केले; मात्र या कामाला आता कमालीचा विलंब होत आहे. बांधकाम सुरू असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कंत्राटदाराकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने सध्या येथे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. आता पावसाळा तोंडावर असल्याने या रखडलेल्या कामामुळे महामार्गावर अधिक भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी हे काम तातडीने आणि गतीने पूर्ण करावे, अशी तीव्र मागणी बीड शहरवासीयांसह प्रवाशांकडून केली जात आहे.
-
देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र 46 टक्क्यांवर; दर्जेदार निर्यात धोरणासाठी वळसे पाटलांचा केंद्राकडे पाठपुरावा
देशात सध्या कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी देशात ३०७ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले असून, त्यापैकी तब्बल ४६.१५ टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात झाले आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे कांदा भिजल्याने त्याची गुणवत्ता घटली आहे आणि परिणामी बाजारभाव ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्रात एक महत्त्वाची बैठक पार पडली असून, यात महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी सहभाग घेतला होता,” अशी माहिती राज्याचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
-
रोहित पवार, अमोल कोल्हेसह मविआच्या नेत्यांचे कांदा प्रश्नावर आंदोलन होणार
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. त्याविरोधात आज पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरमध्ये हा मोर्चा होणार आहे. आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार. महाविकासआघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी होतील. शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि स्थानिक नेते उपस्थित असतील. हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे येणार आहे.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांनी
-
कोल्हापुरातील सासरच्यांवर बीडमध्ये गुन्हा, तुला स्वयंपाक येत नाही म्हणत..
बीड जिल्ह्यातील 26 वर्षीय विवाहितेला पतीच्या अपघाताचा खर्च आणि घरखर्चासाठी माहेरून दीड लाख रुपये आणण्यासाठी सासरच्यांकडून तगादा लावला जात होता. पैसे न दिल्याने “तुला स्वयंपाक चांगला येत नाही” असे कारण काढून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. याप्रकरणी बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पती सतीश मोरे, सासू, सासरे आणि तीन नणंदा अशा एकूण 6 जणांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
दोन तहसीलदारांसह ६ अधिकाऱ्यांना नोटिसा
अमळनेर तालुक्यातील सावखेड्यातील तापी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा आणि डिझेल साठा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले असून खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई निश्चित केली जाणार. दोन तहसीलदार आणि 2 मंडळ अधिकारी, 2 तलाठी अशा एकूण सहा जण कारवाईच्या रडारवर. सावखेडा येथील तापी नदीवरच्या वाळू घाटावर जप्त केलेल्या वाळूसाठ्यापोटी १२ लाख ७९ हजार ३४४ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
-
वसंत गीते यांचा अत्यंत मोठा आरोप..
अनिल कदम यांनी मातोश्रीसोबत चर्चा करून अर्ज भरला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत मोठ हंगामा बघायला मिळतोय. वसंत गित्ते यांनी अर्ज मिळूनही अर्ज भरला नाही. मातोश्रीवरून आम्हा दोघांनाही फॉर्म घेण्याचे आदेश होते. पैशांच्या जोरावर त्यांनी बहुमत मिळवल्याचा आरोप वसंत गीते यांनी केला.
-
कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे वैमानिकांच्या पासिंग आऊट परड सोहळा
भारतीय लष्कराच्या नव्या हेलिकॉप्टर आणि ड्रोन वैमानिकांचा हा परेड सोहळा. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे युद्धभूमीवरील थाराराचा प्रत्यक्ष अनुभव देणारे प्रात्यक्षिके सादर. हेलिकॉप्टर ड्रोन तोफखाना रणगाडे आणि पायदळ दलाच्या संयुक्त कारवाईचे सादरीकरण. भारतीय लष्कराच्या क्षमतेचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन
-
आमच्या लोकांना जेवण वाढले का जात नाही?”; लग्नातील वादाचे तुंबळ हाणामारीत रूपांतर
चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथील घटना. जेवण वाढण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आल्यानंतर लग्नमंडपात उडाला होता मोठा गोंधळ. या वादात एका व्यक्तीच्या डोक्यात काठी लागल्याने तो जखमी झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात मेहूनबारे पोलीस स्थानकात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
पिंपरी-चिंचवडमधील अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर मोठी कारवाई
फुगेवाडीमधील विषारी दारू प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या अड्ड्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी विविध भागांत छापे टाकून मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू, रसायने आणि दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहेत. अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
जळगावच्या एमआयडीसीतील रेमंड पतसंस्थेत 38 लाख 84 हजारांचा घोटाळा
जळगावच्या एमआयडीसीतील रेमंड पतसंस्थेत 38 लाख 84 हजारांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संस्थेचे तत्कालीन माजी सचिव आणि माजी व्यवस्थापक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सचिव नरेंद्र गोविंदराव पाटील आणि माजी व्यवस्थापक श्रीराम आत्माराम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहेत. माजी सचिव आणि माजी व्यवस्थापक या दोघांनी विविध निधींमधून हा डल्ला मारल्याचं विशेष लेखापरीक्षणात समोर आलं. तपासणीदरम्यान संस्थेच्या मुख्य खात्यांमध्ये आणि जमा-खर्चात वेगवेगळ्या हिशोबात आणि निधींमध्ये एकूण 38 लाख 84 हजार 241 रुपयांची अफरातफर केल्याचं समोर आलं.
-
मुंबईला पाणीपुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला
मुंबईला पाणीपुरवठा करणारा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला असून फक्त 40 दिवस पाणीपुरवठा होईल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राज्य सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला आहे. यामुळे या तलावातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 1 जूनपर्यंत या तलावात 7 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा परिस्थिती बिकट झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावांमधील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस मोठी घट होत असून, सध्या केवळ 15.57 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
-
तुळजाभवानी मंदिर संस्थानला पेड दर्शनातून दोन कोटींचं उत्पन्न
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात अधिक मासामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अधिकमासाचा फायदा मंदिर संस्थानालाही चांगलाच होताना दिसून आला असून पेड दर्शनाच्या माध्यमातून मंदिर संस्थानला 15 मे ते 30 मे या कालावधीत जवळपास दोन कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. पेड देणगी दर्शनास भाविकांनी मोठी पसंती दिली आहे. या कालावधीत जवळपास 70 हजार भाविकांनी पेड दर्शन घेतलं आहे.
-
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. त्याविरोधात आज आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
-
जालना जिल्ह्यात 4 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा
कुलाबा इथल्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून जालना जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याने शेती मालाचं नुकसान टाळण्यासाठी वेळीच नियोजन करावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
-
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची पाच ठिकाणी धडक कारवाई
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पाच ठिकाणी धडक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या विशेष मोहिमेत तब्बल 19 लाख 3 हजार 379 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
मंचर इथं प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच, विनापरवाना चालणाऱ्या ‘खेमराज फूड इंडस्ट्रीज’मधून साडेदहा लाखांचा मैदा, बेसन आणि आट्याचा साठा जप्त करण्यात आला.