Maharashtra News LIVE : मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; पाणी टंचाई आणि शेतीच्या नुकसानीवर होणार चर्चा
Maharashtra News LIVE Updates : भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातची मुलगी तृप्तबालाची आज SIT चौकशी होणार आहे. तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातने कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर आलं होतं.

LIVE NEWS & UPDATES
-
मुंबई-विजयदुर्ग रो-रो बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड; सागरी प्रवास अनिश्चित काळासाठी स्थगित
कोकण किनारपट्टीवरील प्रवाशांना जलद प्रवासाचा पर्याय देणारी मुंबई ते विजयदुर्ग सागरी रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या २५ दिवसांतच बंद पडली आहे. १ मार्च रोजी मोठ्या उत्साहात सुरू झालेली ही सेवा आता तांत्रिक बिघाडामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बोटीच्या इंजिनमध्ये गंभीर बिघाड झाल्याने ही सेवा पूर्ववत होण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सहा तासांत मुंबई गाठण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, महागडे तिकीट दर आणि बोटीवरील सोयी-सुविधांचा सुमार दर्जा यामुळे प्रवाशांनी आधीच या सेवेकडे पाठ फिरवली होती, त्यातच आता तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
-
बीड: मस्साजोग सरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून १३ एप्रिलपर्यंत इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार २८ एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर २९ एप्रिलला निकाल जाहीर केला जाईल. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. गावातील राजकीय वातावरण पाहता ही निवड बिनविरोध होणार की चुरशीची लढत पाहायला मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
-
-
पुण्याच्या राहीजा गार्डन्स पुलाजवळ भीषण अपघात; टँकरने महिलेला चिरडले
पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील राहीजा गार्डन्स पुलाजवळ एका भीषण अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका टँकरने महिलेला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. सध्या मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा येथे मांगीरबाबा यात्रेचा उत्साह; लाखो भाविकांची गर्दी कायम
छत्रपती संभाजीनगर जवळील शेंद्रा येथील प्रसिद्ध मांगीरबाबा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. आज तिसऱ्या दिवशी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशातूनही हजारो भाविक या ठिकाणी दाखल झाल्याने शेंद्रा परिसर भक्तीमय झाला आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या असून, भाविकांकडून पारंपरिक पद्धतीने रेवड्या फेकून आणि बोकड-कोंबड्यांचा बळी देऊन नवस फेडले जात आहेत. धार्मिक श्रद्धा आणि अलोट गर्दीमुळे या यात्रेने यंदाही आपला मोठा लौकिक राखला आहे.
-
मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; राज्यातील पाणी टंचाईवर आणि अवकाळीच्या नुकसानीवर होणार चर्चा
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील गंभीर होत चाललेली पाणी टंचाई, जनावरांसाठीच्या चारा छावण्यांचे नियोजन आणि अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
-
-
क्रिकेट सामन्यात डीजेच्या आवाज महागात पडला, मधमाशांच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू
चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीत एका क्रिकेट सामन्यादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावर लावलेल्या डीजेच्या मोठ्या आवाजामुळे झाडावरील मधमाशांचे मोहोळ उठले आणि त्यांनी उपस्थित नागरिकांवर भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात मधुकर रंगारी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, अन्य २ जण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार डीजेच्या कंपनांमुळेच मधमाशा खवळल्याने हा अनर्थ ओढवला.
-
शरद पवारांनी कौटुंबिक कारणाने उमेदवार दिला नाही – संजय राऊत
मी शरद पवारांच्या विचाराशी सहमत आहे. आम्ही भाजपला घाबरत नाही. शरद पवारांनी कौटुंबिक कारणाने उमेदवार दिला नाही. अजित दादांनी देखील पिंपरी चिंचवडची निवडणूक लढवली होती. लोकशाहीत कुणी निवडणूक लढत नसेल, तर दबाव का आणायचा? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
-
तीन हजार पोलीस जवानांचे ऑपरेशन, माओवादी संघटनेच्या..
माओवादी संघटनेत एकमेव उरलेला_शेवटच्या नेता कमांडरला ठार मारण्यासाठी झारखंड राज्यात ३ हजार पोलीस जवानांच्या ऑपरेशन. माओवादी संघटनेत आता दोन मोठे नेते उरलेले आहेत_ केंद्रीय समितीच्या सदस्य असलेला गणपती हा देश सोडून विदेशात फरार झाल्याची गुप्त माहिती आहे. दुसरा नेता माओवादी संघटनेच्या कमांडर मिशीर बेसरा आपल्या ४० ते ५० शस्त्रांचा साथीदारासोबत झारखंडच्या जंगलातील सारंडा या भागात असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या माहितीच्या आधारे झारखंड राज्यात मोठ्या प्रमाणात या माओवाद्यांना ठार मारण्यासाठी सीआरपीएफ जवान व कोब्रा बटालियनच्या ऑपरेशन दोन दिवसापासून सुरू आहे. हे दोन्ही मोठे माओवाद्यांचे नेते गडचिरोली जिल्हासह तेलंगाना छत्तीसगड झारखंड उडीसा या राज्यात माओवादी चळवळीत गेल्या 40 वर्षापासून काम करीत आहे
-
ज्वारी व मका खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी..
जळगावच्या पारोळा येथे शेतकी संघाबाहेर ज्वारी व मका खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी, दोन दिवसांपासून लागल्या मोठ्या रांगा. शासकीय ज्वारी व मका खरेदी ऑनलाइन नाव नोंदणी सुरू झाल्याच्या अफवेने शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. ज्वारी – मका खरेदीसाठी नोंदणी सुरू झाल्याच्या अफवेने शेतकी संघाबाहेर शेतकऱ्यांच्या मोठा रांगा लागल्या असून दोन दिवसापासून शेतकऱ्यांचा मुक्काम आहे. दोन दिवसांपासून रांगेत थांबलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे प्रशासनाकडून तातडीने आदेश काढण्यात आले असून आजपासून नाव नोंदणीची प्रक्रिया पार पडणार.
-
बेळगाव सीमा प्रश्नावरून चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटलांमध्ये रंगली जुगलबंदी
बेळगाव सीमा प्रश्नावरून सांगली मध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांमध्ये चांगलीचं जुगलबंदी रंगली.बेळगाववासी आशा लावून बसलेले आहेत,चंद्रकांतदादांना आमची जबाबदारी दिलेली आहे, पण चंद्रकांतदादाच भेटत नाही,त्यामुळे मी बेळगाव वासीयांचा निरोप घेऊन आलोय, असा मिश्किल टोला जयंत पाटलांना लगावला.
-
जळगाव जिल्ह्यात केळीची निर्यात थांबल्याने केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका
शेतकऱ्यात तीव्र संताप. जिकडेतिकडे भोंदू बाबा अशोक खरात यांचाच विषय चालू आहे आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्या. नुसतं फक्त अशोक खरात सर्वत्र दिसतो आम्ही शेतकरी नाही आमच्याकडे लक्ष द्या. आमच्या केळीला भाव नाही सतत नैसर्गिक संकट येत आहे काय करावे. सरकारचं लक्ष अशोक खरात कडे जास्त आमच्याकडे कमी झालं शेतकरी म्हणताय
-
पार्थ पवार लहान त्याच्यावर बोलणे योग्य नाही- नाना पटोले
नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, संजय राऊतांना त्यांच्याच पक्षात कोणी विचारात घेत नाही. पार्थ लहान आहे, त्याच्यावर बोलणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
-
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल
सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली. मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी याविरोधात ऑनलाईन तक्रार दिलीय. महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असे चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने 6 दिवसापूर्वी निवेदन दिले होते. मात्र जैनमुनीविरोधात गुन्हा दाखल होत नसल्याने अ
-
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वृक्षतोडीबाबत आज सुनावणी
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वृक्षतोडीबाबत आज सुनावणी होणार आहे. हरित लवादामध्ये आज सुनावणी होणार आहे. वकील श्रीराम पिंगळे वृक्षतोडीविरोधात भूमिका मांडणार आहेत. नाशिक शहरातील सगळ्या वृक्षतोडीबाबत हरित लवाद काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून आहे. याचिकाकर्ते मनीष बाविस्कर यांनी याचिका दाखल केली आहे.
-
बीड – सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने विशेष सरकारी वकील उज्वल निकम बदलण्याचा अर्ज फेटाळला होता. चार्ज फ्रेम झाल्यापासून खून, खंडणी आणि ॲट्रॉसिटी या मूळ प्रकरणाच्या युक्तिवादाला अद्याप सुरूवात झालेली नाही. यासंदर्भातील युक्तिवादाला आज सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर आरोपींच्या संपत्ती जप्ती संदर्भातील निर्णय कोर्टाने राखून ठेवलेला आहे.
-
भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाची आज पत्रकार परिषद
नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाची आज पत्रकार परिषद होणार आहे. भोंदू खरात विरुद्ध नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने माहिती देण्यात येईल. आठ एप्रिल रोजी भोंदू अशोक खरात याला कोर्टात हजर केलं जाणार असल्याने त्यापूर्वीच आज एसआयटीची पत्रकार परिषद घेण्यात येत आहे.
-
म्हाडाचा अर्थसंकल्प १६ हजार कोटींचा टप्पा ओलांडणार
मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२५-२०२६ साली १५,५६.९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडणारे म्हाडा येत्या दोन दिवसांत २०२६-२०२७ या नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पात म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या मंडळांमार्फत किती सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट असेल, त्यासाठी किती कोटींची तरतूद करण्यात येईल? हे या निमित्ताने स्पष्ट होईल. यंदाचा अर्थसंकल्प १६ हजार कोटींचा आकडा ओलांडेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
-
त्रिभाषा सूत्रासाठी राज्य सरकार सीबीएसई पॅटर्न लागू करणार का? दोन आठवड्यांत निर्णय होण्याची शक्यता
सीबीएसईने त्रिभाषा सूत्र सहावीपासून लागू करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये ते कोणत्या इयत्तेपासून लागू करणार, की पुन्हा पहिलीपासून हिंदी किंवा अन्य तिसऱ्या भाषेची सक्ती केली जाणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सीबीएसईच्या निर्णयाचा आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालाचा अभ्यास करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह यांनी स्पष्ट केले.
-
एनडीए परीक्षेमुळे १२ एप्रिलची पीसीए CET परीक्षा रद्द
यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या एनडीए, सीडीएस परीक्षांमुळे १२ एप्रिलला होणारी इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे.
-
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला जन्मठेप; अमित जोगीला छत्तीसगड हायकोर्टाने सुनावली शिक्षा
रायपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामावतार जग्गी यांच्या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा पुत्र अमित जोगी याला छत्तीसगड उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमित हा कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. त्याला १,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. राष्ट्रवादीचे नेते जग्गी यांच्या हत्येचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामावतार जग्गी हे आपल्या कारमधून प्रवास करत असताना त्यांच्यावर ४ जून २००३ रोजी गोळीबार करण्यात आला. त्यांचा दुसऱ्या दिवशी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी अजित जोगी हे राज्याचे मुख्यमंत्री होते.
-
घाटकोपरमध्ये पुन्हा उफाळला मराठी-गुजराती वाद; शौचालय वापरल्याने तरुणाला मारहाण
घाटकोपर पूर्व इथल्या नालंदा सोसायटीत असलेल्या एका सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यामुळे अक्षय बांगरे या मराठी तरुणाने गुजराती व्यावसायिकाकडून मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यानंतर तिथे पुन्हा मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळून आला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेऊन आंदोलन केलं.
-
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए..; भोंदू अशोक खरातचं चौकशीदरम्यान धक्कादायक विधान
नाशिक- “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए..,” असं धक्कादायक विधान भोंदू अशोक खरातने चौकशीदरम्यान केलं. चमत्कार करून नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकावल्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. भोंदू अशोक खरातला कोणताही पश्चाताप नसल्याचं समजतंय. जे काही केलं ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून केल्याची भोंदू खरातने कबुली दिली.
-
भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार- सूत्र
भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातची मुलगी तृप्तबालाची आज SIT चौकशी होणार आहे. तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातने कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर आलं होतं. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आज मुलीची चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
इराणला करार करण्यासाठी दिलेली मंगळवारची मुदत वाढवली जाणार नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. तसंच इराणने दिलेला शांतता प्रस्ताव पुरेसा नसल्याचं नमूद केलं. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अंतिम मुदत पाळली गेली नाही तर अमेरिका इराणचे ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करेल, या इशाऱ्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. इराणला एका रात्रीत संपवू आणि ती रात्र आजची असेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. दुसरीकडे इराणने युद्ध समाप्तीचा प्रस्ताव फेटाळला. पुन्हा आमच्यावर हल्ला होणार नाही अशी हमी मिळाली तरच युद्ध समाप्ती स्वीकारू, असं इजिप्तमधील इराणी दूतावासाचे प्रमुख मोजतबा फरदौसी पोर यांनी सांगितलं. इराणने शस्त्रसंधीबाबत आपली भूमिका पाकिस्तानला कळवताना थेट अमेरिकेशी चर्चेस नकार दिला. प्रस्तावित शस्त्रसंधीचा कालावधी 45 दिवसांचाच असेल तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची मागणीही इराणने फेटाळली. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.