Maharashtra News LIVE : सिया आणि चेतनला आज कोर्टात केले जाणार हजर, मोठ्या घडामोडींना वेग..
Maharashtra News LIVE : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे.अनेक भागात नदी नाले एक झाले आहेत. तर दमदार पावसामुळे पेरणीला वेग आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
जळगावात लाचखोरीप्रकरणी अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या घराची एसीबीकडून ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती
मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घराची नाशिक आणि जळगाव येथील एसीबीच्या संयुक्त पथकाकडून ‘इन-कॅमेरा’ तपासणी. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांचे पथकाकडून रात्री उशिरापर्यंत इन-कॅमेरा’ तपासणी सुरू होती, अशी माहिती मिळाली. या कारवाईत नेमके काय सापडले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी मोठे घबाड हाती लागल्याचे बोलले जात आहे.
-
इगतपुरी पोलिसांची मोठी कारवाई
समृद्धी महामार्गावरील पिंपरी फाटा येथील इंटरचेंज जवळ लाखो रुपयांचा गुटखा वाहतूक करणारा कंटेनर घेतला ताब्यात. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गुटख्याने भरलेला कंटेनर केला जप्त. तीन इसमान विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल
-
-
नवी मुंबईत दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का, कार्यकारी अभियंता निलंबित
नेरूळ एल.पी. नाका उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्यातून जात असताना दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याच्या गंभीर प्रकरणात नवी मुंबई महापालिकेने पहिली मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. महापालिका परिमंडळ-१ येथील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना गुरुवारी तात्काळ निलंबित करण्यात आले. संबंधित ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने हा अपघात घडल्याचे नमूद करत, कार्यालयप्रमुख म्हणून कामावर नियंत्रणाचा अभाव आणि कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
-
मुंबई गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात पाणीच पाणी
मुंबई गोवा महामार्ग पहिल्याच पावसात नागोठणे जवळील चिकणी या ठिकाणी पाणी. याच पाण्यातून सध्या वाहन चालकांना मार्ग काढावा लागत आहे. या साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाहीये.
-
सिया-चेतनला न्यायालयात हजर केलं जाणार, मोठ्या घडामोडी
केतन अगरवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळं आज या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीच नंतर हजर केलं जाईल. न्यायाधीश ए एम विभूतेंच्या समोर ही सुनावणी पार पडेल. सियाने तिचा युक्तिवाद वकील विपुल दूशिंग हेचं करतील असं न्यायालयात म्हटल्यानं आता वकील आशुतोष श्रीवास्तवांनी माघार घेतल्याचं बोललं जातंय. चेतन चौधरीच्या बाजूने वकील राधिकेश उत्तरवार आणि राम शहाणे बाजू मांडतील. तर सरकारी वकील म्हणून राजश्री विरकुड कामकाज पाहतील.
-
-
स्मार्ट मीटरला स्थगिती देण्याची भाजप आमदाराची मागणी
स्मार्ट मीटरला स्थगिती देण्याची भाजप आमदाराची मागणी आहे. सोलापूरचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत मागणी केली आहे. स्मार्ट मिटर लावल्यामुळे वीज बिलामध्ये दुपटीने वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येतं आहेत. त्यामुळे या स्मार्ट मध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत का याची तपासणी करण्यात यावी. मागील काही महिन्यात ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत त्यांच्या विजाबीलात मोठी वाढ झाल्याची तक्रार आहेत. या संदर्भात महावितरणचे अधिकारी कोणतीही माहिती द्यायला तयार नाही. त्यामुळे या मीटरमध्ये कोणती तांत्रिक अडचण असल्यास त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती कोणावर करण्यात येऊ नये.
-
पुरंदर विमानतळासाठी संमतीची मुदत १५ जुलैपर्यंत
पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनासंदर्भातील करारनाम्यांद्वारे संमती देण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत १,२१६ हेक्टरपैकी १,०१० हेक्टर जमीन संपादित झाली असून सुमारे १,१५० कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे. उर्वरित भूसंपादनासाठी आणि १० टक्के विकसित भूखंडाच्या लाभासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
-
परशुराम घाटात आणखी एक नवा धोका
चिपळूणच्या परशुराम घाटात आणखी एक नवा धोका निर्माण झाला. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट काँक्रीट मार्ग खचला आहे. पायऱ्यांच्या स्वरूपातील काँक्रीट चॅनल तुटले आहे. तुटलेला काँक्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत आहे. तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका निर्माण झाला आहे. घाटाच्या संरक्षण व्यवस्थेलाच तडा गेला. गॅबियन भिंतीच्या पायाखालची मातीही सरकली आहे. त्यामुळे दुहेरी धोक्यामुळे परशुराम घाटाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. घाट संरक्षणाचे काम ऐरणीवर आले आहे. धोकादायक तुटलेला भाग तातडीने हटविण्याची गरज आहे.
-
धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातील गूढ आवाजाची मालिका सुरूच
धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातील गूढ आवाजाची मालिका सुरूच 109 दिवसांत 19 वेळा आवाज आला. काल उशिरा पुन्हा जिल्ह्यात गूढ आवाज आला. दारे-खिडक्या हादरल्या. प्राथमिक अंदाजानुसार, हिंगोलीतील 3.5 रिश्टर स्केल भूकंपाचा परिणाम असू शकतो आसा एक्सपर्ट चा अंदाज आहे. 2 एप्रिल 2025 रोजी पत्र पाठवूनही 120 दिवसांपासून तज्ज्ञांचे पथक दाखल नसल्याची जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची माहिती दिली. नागपूरच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला जिल्हा प्रशासनाचा पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी अद्याप नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, गूढ आवाजांचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
-
पावसानंतरही पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई
मान्सून सक्रिय होऊनही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम आहे. जिल्हा प्रशासनाच्या १५१ टँकरद्वारे २५७ गावे आणि ६३२ वाड्यावस्त्यांतील २ लाख ५८ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड तालुक्यांत सर्वाधिक टँकर सुरू असून, भूजलपातळी न वाढल्याने टँकरवरील अवलंबित्व अद्याप कायम असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
-
मुंबईत पावसाची रिपरिप
काल रात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम अंधेरी सबवेमध्ये दिसून येत आहे. अंधेरी सबवे गेल्या 15 मिनिटांपासून बंद करण्यात आला होता. सध्या पाणी कमी झाल्यानंतर वाहनांच्या वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला आहे.
-
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
आज उद्धव ठाकरे यांची दुपारी पत्रकार परिषद आहे. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. पक्ष बांधणीसाठी हा दौरा महत्त्वाचा होता. मुंबईत येताच त्यांचे जवळचे सहकारी सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. या सर्व घडामोडींवर आज ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Maharashtra News LIVE : राज्यात मान्सूनने उशीरा का असेना चांगली धडक दिली. तळकोकणापासून ते मुंबईपर्यंत ढगांची गर्दी जमली आहे. राज्यात सर्वदूर पावसाच्या आगमनाने डोंगररागांनी हिरवाईचा शालू नेसला आहे. तर धबधबे प्रवाहित झाले आहेत. राज्यातील अनेक भागात दमदार पावसामुळे नदीनाले एक झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. तर पहिल्याच जोरदार पावसामुळे प्रशासनाचे पितळ उघडं पडलं आहे. मान्सूनपूर्व साफसफाईची कामे न केल्याने अनेक शहरात रस्त्यावर पाणी तुंबले आहे. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. संसारपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे.
मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे. उद्धव ठाकरे हे नुकताच बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करून आले आहेत. ते परतले नाही तोच त्यांचे विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी शिंदे गटात उडी घेतली. ते आता विधान परिषदचे उपसभापति आहेत. या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने आनंदवार्ता दिली आहे. तर शेतीकामांसाठी गौण खनिजांवरील रॉयल्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.