AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजयाने माणूस नम्र होतो, राण्यांचं उलट आहे, ते हिंस्त्र होतात – सामनातून हल्लाबोल

मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचं उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतातअशा शब्दांत शिवसेना (उबाठा) मुखपत्र 'सामना' मधून नारायण राणेंवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. कोकणातून शिवसेना संपवली या राणेंच्या टीकेला सामनातून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं

विजयाने माणूस नम्र होतो, राण्यांचं उलट आहे, ते हिंस्त्र होतात - सामनातून हल्लाबोल
| Updated on: Jun 17, 2024 | 8:44 AM
Share

मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचं उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतातअशा शब्दांत शिवसेना (उबाठा) मुखपत्र ‘सामना’ मधून नारायण राणेंवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. कोकणातून शिवसेना संपवली या राणेंच्या टीकेला सामनातून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेचा पराभव करणे राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही. एखाद्या पराभवाने खचणारी व मागे हटणारी शिवसेना नाही. राणे व त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली, अशा शब्दांत सामनामधून टीका करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात ?

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा…

मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा विजय

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांत भाजपचा पुरता निकाल जनतेने लावला आहे. ‘अब की बार चार सौ पार’वाल्यांचे नाक महाराष्ट्राने कापले, तर त्यांचे दोन्ही कान उत्तर प्रदेशने व ‘मुंडण’ कार्यक्रम राहुल गांधी यांनी केला. तरीही हे लोक विजयाच्या पिपाण्या वाजवत फिरतात हा विनोद आहे. भाजपचा आकडा महाराष्ट्रात नऊवर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे हे आहेत. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे. आता श्रीमान राणे यांनी दावा केला आहे की, ‘‘लोकसभा निवडणुकीत कोकणातील शिवसेना आपण संपवली. यापुढे कोकणात कुणाला थारा देणार नाही. आमच्या आडवे कोण आले तर त्यांची जागा दाखवून देऊ.’’ नारोबांचे हे फूत्कार भाजपच्या अहंकारी वृत्तीस साजेसे आहेत. काही लोकांना ‘जय’ विनम्रपणे स्वीकारता येत नाही. त्यातले हे महाशय आहेत.

राणे हे आधीच्या मोदी सरकारात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग खात्याचे मंत्री होते. नव्या रालोआ मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्या व त्यातूनच ‘शिवसेना संपली, संपवली’ अशी भाषा बोलू लागले. राणे हे पुन्हा मंत्री झाले नाहीत, ही त्यांची योग्यता. (‘लायकी’ हा शब्द अधिक उचित आहे.) राणे हे कधीकाळी शिवसेनेत होते. शिवसेनेत मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व पदे भोगून त्यांनी पक्ष सोडला. राणे हे शिवसेनेमुळे आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाले. त्यांच्या घरावर सोन्याची कौले व डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला, पण खाल्ल्या घरचे वासे मोजावेत तसे त्यांचे वर्तन घडले.

राणेंना विजयाचे अजीर्ण झाले

राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये जाताना त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर घाणेरडी टीका केली. खासगीत ते भाजप नेत्यांवरही हवे ते बोलतात. मोदी यांनी त्यांना आता मंत्री केले नाही व खासदार होऊनही बेकारीचे जिणे आल्याने मोदी विरोधाची उबळ बाहेर काढून शिवसेना संपविण्याची भाषा करीत आहेत. राणे यांच्याकडे पाहता त्यांची प्रकृती थोडी नाजूक झालेली दिसते. त्यामुळे त्यांना विजयाचे अजीर्ण झाले. असा अजीर्णाचा त्रास राणे यांना यापूर्वी अनेकदा झाला, पण या पोटदुखीवर शिवसेनेनेच जालीम उपाय वेळोवेळी केला.

शिवसेनेने राणे व त्यांच्या टोळय़ांचा कोकणातील दहशतवाद मोडून त्यांचा पराभव केला. राणे यांना शिवसेनेने कोकणातही पाडले व मुंबईतही पराभूत केले. (येथे ‘गाडले’ हा शब्द अधिक उचित आहे.) त्यामुळे शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांना अनेकदा कशी माती खावी लागली हे कोकणची जनता जाणते. कोकणातील निवडणुका म्हणजे ‘हऱ्या-नाऱ्या’ टोळीकडून रक्ताची होळी व खुनाखुनीचा शिमगाच असे. रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत असली तरी या बिल्लीचा खरा इतिहास स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत जाहीर केला आहे.

राणे यांची खासदारकी औटघटकेची ठरू शकते

कोकणात या वेळी नारायण राणे कसे जिंकले त्याचे पुरावे समोर आले आहेत. घरात पैशांची पाकिटे पोहोचवून, पाठवून, लोकांना भ्रष्ट करून, मते विकत घेऊन राणे यांनी हा विजय मिळविल्याचे कॅमेऱ्यावर स्पष्ट दिसते. निवडणूक यंत्रणा व जिल्हय़ाची प्रशासकीय यंत्रणा मिंधी व बुळी असल्यानेच राणे यांना 48 हजार मतांनी खासदारकीचा टोप डोक्यावर चढवता आला, पण मते विकत घेण्याचा हा प्रकार कोर्टात पोहोचल्याने राणे यांची खासदारकी औटघटकेची ठरू शकते. राणे यांना 4,48,514 मते, तर शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 4,00,656 मते मिळाली. म्हणजे स्वतःस महान नेते वगैरे समजणाऱ्या राण्यांना पन्नास हजारांचीही आघाडी मिळालेली नाही. पैशांचा खेळ प्रशासन-पोलिसांच्या सहकार्याने झाला नसता तर राणे किमान दीड-दोन लाखांच्या फरकाने पराभूत झाले असते, पण पन्नास हजारांनी जिंकलेले राणे हे ‘कोकण’ दिग्विजयाच्या वल्गना करीत आहेत.

राणे ज्या पक्षात जातात, त्या पक्षाचा पराभव होतो

सत्य असे की, भाजपचा पराभव झाला व महाराष्ट्राने मोदी-शहांना त्यांची जागा दाखवली. मोदी-शहा यांनी शिवसेना संपविण्यासाठी काय करायचे बाकी ठेवले? पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने एक झंझावात निर्माण केला व त्यात भाजप उडून गेला. राणे स्वतः कसेबसे जिंकले, पण भाजप हरला. राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची महाराष्ट्रात हीच अवस्था होते, त्या पक्षाचा पराभव होतो, असे राणे यांचे सध्याचे सहकारी दीपक केसरकर यांनी सांगितले ते तंतोतंत खरे ठरले. राणे यांनी शिवसेनेचा पराभव कोकणात केला हे असत्य आहे.

पैसा व पोलीस यंत्रणेच्या मदतीने त्यांनी कोकणी बाणा व स्वाभिमानाची तात्पुरती पीछेहाट केली. कोकणच्या जमिनी, उद्योग यावर परप्रांतीयांचा डोळा आहे. कोकणात विषारी प्रकल्प येत आहेत. त्यावर राणे यांनी बोलायला हवे. शिवसेनेचा पराभव करणे राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही. एखाद्या पराभवाने खचणारी व मागे हटणारी शिवसेना नाही. राणे व त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली. चौथ्यांदाही पराभव होईल. मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचे उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतात. मोदी-फडणवीस-शहांचे तसेच झाले होते. महाराष्ट्राने त्यांचा पराभव केला!

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.