Election Commission : दुबार मतदाराच्या नावावर निवडणूक आयोगाचं धक्कादायक उत्तर, अरविंद सावंतांनी सांगितलं आत काय घडलं?
Election Commission : "गावात एका घरात 85 लोकांची नाव दाखवली. त्या घरात कोण राहतं? मूळात ते घरच अस्तित्वात नाही. शेवटच्या क्षणी नाव घुसवायची हे अराजकाकडे नेणारं आहे. आम्हाला नाव डिलिट करण्याचा अधिकार नाही. विधानसभेची यादी नका दाखवू. महापालिकेच्या यादीत असं काही नजरेस आल्यास दाखवून द्या" अशी उत्तर निवडणूक आयोगाने दिल्याच अरविंद सावंत यांनी सांगितलं

लवकरच महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. त्याआधी मतदार याद्यांवरुन काही मुद्दे आहेत, त्या संदर्भात आज महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या संदर्भात दक्षिण मुंबईचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी माहिती दिली.
“सर्व राजकीय पक्षांना कळवणं तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्ही कळवत नाही हा एक मुद्दा आहे. जुलैनंतर ज्यांना 18 वर्ष होतील त्यांची नोंदणी कोण करणार? दुबार नावांच्या नोंदणीबाबत त्यांनी जे उत्तर दिलं, ते खूप धक्कादायक होतं. बिहारमध्ये Sir करतात, आणि इथे दुबार नावं डिलिट करण्याचा अधिकार नाही असं सांगतात. मग, तो मतदार दोन्ही ठिकाणी मतदान करणार का?. आम्ही विचारलं. त्यावर मतदाराला विचारु तुला कुठे मतदान करायचं आहे, असं धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं” असं अरविंद सावंत म्हणाले.
त्यांनी 28 हजार दुबार मतदारांची नाव दाखवली
“खरतर दुबार मतदाराने जिथे राहतो तिथे मतदान केलं पाहिजे. दुबार मतदाराच नाव का नाही डिलिट करणार? हे सगळ्यात धक्कादायक होतं. वोटचोरी सुरु होते ते इथून. आमच्यासोबत पनवेलचे आमदार होते, त्यांनी 28 हजार दुबार मतदारांची नाव दाखवली. त्यात 11,066 मतं एकाच मतदारसंघातली होती. काय कारवाई केली? काही नाही” असं अरविंद सावंत म्हणाले.
उद्याची चोरी कशी करायची याच प्लानिंग केलेलं दिसतं
“मुंबईसह महानगरात इतर राज्यातील प्रचंड मुलं आहेत. त्यांची नावं इथेही आहेत आणि गावी सुद्धा आहेत. ती दुबार नाव कोण शोधणार?” असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला. “व्हीव्हीपॅट मशीनबाबत धक्कादायक उत्तर दिलं. नवीन मशीनला व्हीव्हीपॅट नाही. नवीन मशीनला व्हीव्हीपॅट अटॅच करता येणार नाही. म्हणजे उद्याची चोरी कशी करायची याच प्लानिंग केलेलं दिसतं. निवडणूक लागण्याआधी जुलैमध्ये मतदार नोंदणी का बंद केली?” असे प्रश्न अरविंद सावंत यांनी विचारले.
