Maharashtra investment : अवघ्या तासाभरात महाराष्ट्राने कमावले 44 हजार कोटी… हजारो रोजगारही मिळणार; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीने पालटणार नशीब
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ८ कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत. यामुळे राज्यात सुमारे ४४,७१० कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक होणार असून, ७,०३० नवीन रोजगार निर्मितीची शक्यता आहे. एरोस्पेस, डेटा सेंटर, स्टील, ग्रीन इनिशिएटिव्ह, हायड्रोजन साठवण प्रणाली आणि फायबर उत्पादन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होईल. यामुळे नांदेड, पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल.

महाराष्ट्रातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या उद्योग विभागाने 8 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. या करारांमुळे महाराष्ट्रात सुमारे 44 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. एवढंच नव्हे तर या माध्यमातून 7 हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती होण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये एरोस्पेस, डेटा सेंटर, स्टील, ग्रीन इनिशिएटिव्ह, हायड्रोजन व नैसर्गिक वायू साठवण प्रणाली, फायबर उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विधानभवनात उद्योग विभागाच्या वतीने बुधवारी आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांस या आठ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जानेवारी 2025 आणि 2026 मध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषद मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. जगभरातील मोठ्या कंपन्यांशी बैठक घेणे आणि महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी सामंजस्य करार करणे आणि डेटा सेंटर, ऑटोमोबाईल, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्मिती, संरक्षण व एरोस्पेस, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रातील गुंतवणूक करारांवर आता प्रत्यक्ष कृतीला सुरूवात झाली आहे.
आठ कंपन्यांसोबत करार, हजारो कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठ कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्यामुळे महाराष्ट्रात एकूण 44 हजार 710 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच या कराराच्या माध्यमातून सुमारे 7 हजार 030 रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने गुंतवणूकदारांसाठी आवश्यक यंत्रणा उभी केली आहे. शासन आणि उद्योगक्षेत्र एकत्रितपणे प्रगती करू शकतो, असा महाराष्ट्राचा सिद्ध झालेला अनुभव आहे. त्यामुळे प्रशासकीय बाबींमध्ये काही अडचण आल्यास शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणूक?
एरोस्पेस, डेटा सेंटर, स्टील, ग्रीन इनिशिएटिव्ह, हायड्रोजन व नैसर्गिक वायू सा आहेठवण प्रणाली, फायबर उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांमुळे नांदेड, नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि अमरावती या भागांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
कोणाशी झाले सांमजस्य करार ?
१) रेटाविया प्रा. लि. (नांदेड) यांचा हेलिप्लांट प्रकल्प 4250 कोटी
२) एसीई गॅसेस टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (दिंडोरी, नाशिक) यांचा एसीई गॅसेस, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन 750 कोटी
३) टाटा टेक्नॉलॉजीज लि. (नागपूर, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर) यांचा एरोस्पेस व संरक्षणसंबंधित साहित्य 4800 कोटी
४) जेके इन्फोटेक (हिंजवडी, पुणे) यांचा डेटा सेंटर ग्रीन इनिशिएटिव्ह 1 हजार कोटी
५) एस.एम. स्टील्स अँड पॉवर लि. (सलोरी, चंद्रपूर) यांचा इंटिग्रेटेड स्टील व स्पेशल स्टील कॉम्प्लेक्स 20 हजार कोटी
६) कोनार्क सॉफ्टकोर सोल्यूशन्स प्रा. लि. (हिंजवडी, पुणे) यांचा डेटा सेंटर 1600 कोटी
७) ॲडव्हांटेक फ्युएल सिस्टीम प्रा. लि. (सुपा-पारनेर एमआयडीसी, अहिल्यानगर) या हायड्रोजन व नैसर्गिक वायू साठवण प्रणाली 400 कोटी
८) इन्फिनिटीटेड फायबर कंपनी (पीएम मित्रा पार्क, अमरावती) यांचा सर्क्युलर फायबर सेंटर 11 हजार 910 कोटी
