
विमान अपघातात अकाली निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थींचे मंगळवारी रात्री उशिरा नांदेड येथील गोदावरी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. शहरातील काळेश्वर तीर्थक्षेत्रावर अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा विधी पार पडला. तत्पूर्वी, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अजित पवार यांच्या दर्शनासाठी अस्थिकलश यात्रा काढण्यात आली होती, जिथे हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. या विसर्जन प्रसंगी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदावरीच्या तीरावर ‘अजित पवार अमर रहे’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अखेर ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकाकडे असलेला महापालिकेचा कारभार आता लोकप्रतिनिधींच्या हाती येणार असल्याने पालिका मुख्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. या विशेष निवडीसाठी पालिकेतील ऐतिहासिक महापौर दालन पूर्णपणे सज्ज करण्यात आले आहे. दालनाची स्वच्छता, रंगरंगोटी आणि फर्निचरची डागडुजी पूर्ण झाली आहे. नवनिर्वाचित महापौरांच्या स्वागतासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असून, राजकीय वर्तुळात आता ‘मुंबईचा प्रथम नागरिक’ कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या आवारामध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार आज विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भव्य स्मारक विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारले जाणार असून, त्या स्मारकाची जागा निश्चित करण्यासाठी ही महत्त्वाची भेट असल्याचे समजते. सध्या शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये स्मारकाच्या नियोजनाबाबत महत्त्वाची बैठक सुरू असून, आजच या जागेवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. या निमित्ताने पवार कुटुंबातील सदस्य एकाच ठिकाणी आल्याने बारामतीमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गॅस टँकर पलटी झाल्यामुळे मावळ परिसरात वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. या अपघाताला तब्बल १६ तास उलटून गेले तरीही वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही. याचा परिणाम केवळ एक्सप्रेसवेवरच नाही, तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही दिसून येत असून दोन्ही मार्गांवर २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस गळतीचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून अत्यंत सावधगिरीने काम सुरू असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, लोणावळा ते थेट तळेगावपर्यंत वाहनांची कोंडी पाहायला मिळत आहे.
मिरा-भाईंदर शहरात गुन्हेगारीच्या घटना ताज्या असतानाच नवघर पोलिसांनी एका हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भाईंदर पूर्व येथील ‘इन्स्टा फूड कॅफे’ परिसरात हे रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या एका महिला दलालाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, या व्यवसायाच्या दलदलीत ओढल्या गेलेल्या ४ पीडित मुलींची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नवघर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर वाढल्याने ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले आहे. चिंचखेडे, दडपिंप्री, बोरखेडा आणि करगांव परिसरात बिबट्याने आपला मुक्काम ठोकला असून, नुकताच तरवाडे व करगांव परिसरातील हिंगण्या नाल्याजवळील मक्याच्या शेतात बिबट्या वावरतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. भरदिवसा बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. या वाढत्या धोक्याची दखल घेत वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले असून गस्तही वाढवली आहे. इच्छापुर तांडा, चैतन्य तांडा, तरवाडे, खरजई आणि वडगांव लांब परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि एकटे शेतात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहर मनपा महापौर-उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार आहे. 5 फेब्रुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत चंद्रपूर शहर मनपा नगर सचिवांच्या कार्यालयातून 10 उमेदवारी अर्जांची उचल झाली आहे. सर्वाधिक 8 अर्ज भाजप गोटातून नेले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर 2 अर्ज काँग्रेस गटाकडून उचलले गेले आहेत. 5 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असून अर्ज भरतेवेळी महापौर पदाचा उमेदवार आणि सूचक व अनुमोदक स्वतः उपस्थित राहण्याची अट आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सत्तेचा तिढा गुंतत चालला असताना कोणते पक्ष, कोणते गट, महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ट्रम्प यांच्याशी डर्टी डील करताना मोदी कुणाशी बोलत होते? पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं… प्रफुल्ल पटेल मोदी – शाहांचे भक्त… पटेलांना पवार कुटुंबियांचं मुखिया केलंय का? असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही… सध्या कोणत्याही राजकीय निर्णयावर चर्चा करायची नाही… विलीनीकरणावर अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा होती… विलीनीकरण चर्चेत फडणवीस नव्हते… त्यांनी बोलण्याचा अधिकार काय? असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केले…
भाजपकडून शिवसेना उबाठाला सव्वा-सव्वा वर्षांचा महापौर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शिवसेना उबाठा महापौर पद मिळण्याबाबत आग्रही असल्यामुळे आता भाजपकडून शिवसेनेला नवीन प्रस्ताव देण्यात आला आहे. दोन्ही पक्ष पहिल्या अडीच वर्षांसाठी सव्वा-सव्वा वर्ष विभागून घेणार महापौर पद मात्र आधी कोणाचा महापौर होणार यावर चर्चा सुरू असल्याची भाजपच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून या प्रकारचा अधिकृत प्रस्ताव आला नसल्याची शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी माहिती दिली आहे.
नाशिक भाजपात मोठा ट्वीस्ट. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा. महापौर आणि उपमहापौर नाव निश्चिती वर सुनील केदार नाराज असल्याची माहिती. प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती
नोटीसनंतर कारण समाधानकारक न ठरल्यास वेतन कपातीची कारवाई होणार.निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाईची शक्यता. निवडणूक प्रक्रियेत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा.प्रशिक्षण व निवडणूक दिवशी गैरहजर राहणाऱ्यांवर लक्ष. दोषी कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा होण्याची शक्यता.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना थेट कारवाईचे अधिकार.
महापालिका आयुक्त यांचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश सुरक्षेची काळजी घ्या. महापालिकेने पाड काम करण्यासाठी नियमावली तयार केली आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश. जुन्या इमारती पाडताना योग्य त्या नियमाची अंमलबजावणी केली जात नाही सुरक्षेची अंमलबजावणी केली जात नसल्याने आदेश
मेट्रोतून प्रवास केलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी स्टेशन पासून लगेच सुविधा व्हावे यासाठी प्रयत्न. यापूर्व महामेट्रो कडून ई सायकल पीएमपीएल सोबत करार आधी उपाय केले मात्र ते सोयीचे ठरत नसल्याने निर्णय. शहरातील सर्वच रिक्षाचालक आणि महा मेट्रोची प्राथमिक बैठक याबाबत चर्चा करण्यात आली आहे. शहरातील सर्वच रिक्षा संघटना आणि महा मेट्रोमध्ये करार करण्याचे हालचाली सुरू
काल मंगळवार दिनांक 03.02.26 रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास खंडाळा घाटामध्ये मुंबई कॉरिडॉर ( मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ) आडोशी बोगदा या ठिकाणी एक केमिकल टँकर पलटी झाला आहे.
:धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार असा दावा माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी केलाय.धाराशिव मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असुन भाजपा पाठोपाठ आता शिवसेना देखील अध्यक्ष पदासाठी आग्रही आहे. आम्ही फक्त अपेक्षा करत नाही तर कृतीतून दाखवतो त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल धनुष्यबाणाचाच असेल असा दावा तानाजी सावंत यांनी पारा येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेतुन केला आहे.त्यामुळे अध्यक्ष पदावरून भाजप शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचा मुंबईहून बारामतीकडे जाताना विमान अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, पवार कुटुंबाला याची कोणतीही कल्पना नव्हती. यावर स्पष्टपणे बोलताना शरद पवार दिसले. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिगीकरण होणार नसल्याचे स्पष्ट आहे. रोहित पवार यांनीही अजित पवार यांच्या तेराव्यानंतर यावर बोलणार असल्याचे म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतर शंकाही उपस्थित केली जात आहे. सुनेत्रा पवार या लवकरच दिल्ली दाैऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली दाैऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांची भेट घेणार आहेत.