महाराष्ट्र विचित्र संकटात, कुठे मुसळधार पावसाने पत्रे उडाली, तर कुठे कडक उन्हाने अंगाची लाहीलाही; हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update: महाराष्ट्र सध्या लहरी हवामानाच्या कचाट्यात आहे. कोकणात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला, तर विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत केले. हवामान खात्याने पुढील काही दिवसही पाऊस आणि उष्णतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, उष्माघातापासून बचावासाठी योग्य काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.

महाराष्ट्र सध्या लहरी हवामानाच्या तडाख्यात सापडला आहे. कुठे पाऊस सुरू आहे तर कुठे जीवघेणा उकाडा. या विचित्र परिस्थितीमुळे राज्यातील जनता हवालदिल झाली आहे. आज सकाळी कोकणात धुवांधार पाऊस झाला. तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात रखरखीत उन्हाने लोकांना चांगलेच भाजून काढले. अशा या हवामानामुळे आजारी पडण्याचं प्रमाणही वाढलं आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी नागरिकांना विनाकारण दुपारचं घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली. येथील इमारतीवरील पत्रे उडाली. वादळाचा प्रचंड कहर झाल्याने महाडमध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रशासनाला धाव घ्यावी लागली आहे. अचानक अवकाळी पाऊस आणि वादळ आल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
अवकाळीचा इशारा
रत्नागिरीला वैशाख वणव्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काल चार तालुक्यात वादळी पाऊस झाला. आज देखील हवामान खात्याने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड आणि लांजा तालुक्यात काल अवकाळी पाऊस झाला. किनारपट्टी भागात आज देखील हवेतील आद्रता अधिक होती. कोकणात सध्या हवेतील आद्रतेचे प्रमाण 70% वर गेले आहे. सकाळी अंगाची लाही लाही करणारी उष्णता तर दुपारनंतर अवकाळी पाऊस अशी सध्या कोकणातली परिस्थिती आहे. या विचित्र हवामानामुळे सध्या अंबा बागायतदार चिंतेत आहेत. अरबी समुद्रावर सकाळपासूनच काळया ढगांची दाटीवाटी झाली होती. त्यामुळे आजही रात्रीपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नंदूरबार तापले
कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर होता. नंदूरबारमध्ये आज तापमान 43 अंशांवर गेले होते. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून रस्ते अक्षरशः ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून प्रशासन सतर्क झाले आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत विनाकारण बाहेर पडू नये, पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान संभाव्य उष्णतेच्या फटक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उष्णता कक्षही तयार करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
अमरावतीचे तापमान 40 च्या वर
विदर्भातील अमरावतीचे तापमान 40 च्यावर गेले होते. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 44 अंशाच्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून घराबाहेर निघताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काम नसल्यास घराबाहेर पडू नका, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
अकोल्यात उष्णतेचा कहर; येलो अलर्ट जारी…!
शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने उच्चांक गाठला आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर काल गुरुवारी अकोल्यात कमाल तापमान तब्बल 44.3 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे… तर वाढत्या तापमानासोबत कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्याने दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे… तर या उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातील मुख्य रस्ते ओस पडलेले दिसून येतात. दरम्यान, ग्रामीण भागात शेतकरी वर्गालाही कामाच्या वेळा बदलाव्या लागत असून सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा काम करण्यावर भर दिला जात आहे.
सावधगिरीचे उपाय
-दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळा
-भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा
-हलके व सैल कपडे परिधान करा
-डोक्यावर टोपी किंवा कापड वापरा
-लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी
